अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेंतर्गत अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचार्यांच्या नियुक्ती संदर्भातील सुधारित अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय काल 30 जानेवारी 2025 रोजी महिला व बालविकास विभागाने निर्गमित केला आहे. सुधारित अटी व शर्तीनुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे गुणांकन करून सरळसेवेने नियुक्ती करण्याकरिता शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ नुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळसेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सुधारित गुणांकन शैक्षणिक अर्हता तपशील पुढीलप्रमाणे-
अंगणवाडी सेविका व मदतनीस शैक्षणिक किमान अर्हता 12 वी उत्तीर्ण, 80 गुणांपर्यंत
80 टक्क्यापेक्षा जास्त- 60 गुण
70.01 ते 80 टक्के -55 गुण
60.01 ते 70 टक्के-50 गुण
50.01 ते 60 टक्के-45 गुण
50 ते 40 टक्के-40 गुण
ज्या उत्तीर्ण उमेदवारांना 40 टक्क्यापेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी 35 गुण ग्राह्य धरण्यात यावे.
पदवीधर -10 गुण
पदव्युत्तर- 4 गुण
डी.एड -2 गुण
शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा प्रमाणपत्र-2 गुण
अतिरिक्तगुण 20 गुणांपर्यंत
विधवा/अनाथ-10 गुण
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती 5 गुण
इतर मागास प्रवर्ग/विमुक्त जाती/भटक्या जमाती/आर्थिकदृष्या दुर्बल घटक/विशेष मागास प्रवर्ग/ सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग-3 गुण
अंगणवाडी सेविका /अंगणवाडी मदतनीस/मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव-5 गुण.
अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळसेवेने पदभरतीस शासन पत्र दिनांक 9.9.2024 अन्वये दिलेले स्थगिती आदेश रद्द करण्यात आला आहे. त्यानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पद भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास विभागाने दिले आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांमधील ज्या प्रकल्पांमध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या निकषांनुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहेत, त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे, अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगित ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.