Sunday, October 6, 2024
Homeनगर208 शेतकर्‍यांना पशूसंवर्धनची लॉटरी

208 शेतकर्‍यांना पशूसंवर्धनची लॉटरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद पशूसंधर्वन विभागाच्यावतीने राबवण्यात येणार्‍या अनुदानावरील दूध काढणी यंत्र आणि मुक्त संचार गोठ्या योजनेसाठी जिल्ह्यातील 208 शेतकर्‍यांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात आली आहे. यात सर्वाधिक 22 शेतकरी संगमनेर तालुक्यातील असून नेवासा तालुक्यातील 19 शेतकरी आहेत.

- Advertisement -

जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाच्यावतीने राबवण्यात येणार्‍या या योजनांसाठी पात्र शेतकरी (पशूपालक) यांच्याकडून अर्ज मागवण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती कार्यरत आहे. पशूसंवर्धन विभागाच्यावतीने राबवण्यात येणार्‍या दूध काढणी योजनेसाठी 14 तालुक्यातून 3 हजार 313 अर्ज प्राप्त झाले होते. या योजनेसाठी जिल्हा परिषदेने 20 लाख रुपयांची तरतूद केलेली होती. योजनेसाठी पात्र ठरत निवड होणार्‍या शेतकर्‍यांना दूध काढणी यंत्र खरेदीसाठी यंत्राच्या एकूण किंमतीच्या 60 टक्के किंवा जास्ती जास्त 15 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेत जिल्हाभरातील 133 शेतकर्‍यांची निवड करण्यात आली आहे.

मुक्तसंचार गोठ्यासाठी 15 लाख रुपयांची तरतूद पशूसंवर्धन विभागाने केली होती. या योजनेत लॉटरी पध्दतीने 75 लाभार्थी यांची निवड करण्यात आली असून यात निवड होणार्‍या शेतकरी (पशूपालक) यांना एकूण खर्चाच्या 50 टक्केनूसार 20 हजार रुपये प्रत्येकी अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेसाठी जिल्हाभरातून 3 हजार 464 अर्ज प्राप्त झाले होते. यातून लाभार्थी यांची निवड करण्यात आली आहे. ही योजना राबवतांना 3 टक्के अंपग आणि 30 टक्के महिला यांना प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे यांनी दिली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे यांच्या दालनात जिल्हा परिषदे येणार्‍या अभ्यांगत यांच्या हस्त चिठ्ठी काढून इश्वरी पध्दतीने या निवडी करण्यात आल्या आहेत.

लाभार्थी दुध काढणी यंत्र कंसात मुक्त गोठा
अकोले 8 (5), जामखेड 7 (4), कर्जत 11 (6), कोपरगाव 6 (3), नगर 12 (7), नेवासा 12 (7), पारनेर 11 (6), पाथर्डी 9 (5), राहाता 6 (4), राहुरी 12 (7), संगमनेर 14 (8), शेवगाव 8 (4), श्रीगोंदा 11 (6), श्रीरामपूर 6 (3) असे दूध काढणी यंत्र 133 आणि मुक्त गोठा 75 एकूण 208 शेतकर्‍यांची निवड करण्यात आली आहे.

पशुसंवर्धन पंधरवडा
सध्या पशुसंवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या कालावधीमध्ये जनावरांचे प्रजनन, आरोग्य, खाद्य, चारा नियोजन व व्यवस्थापन याबाबत पशुसंवर्धन विभागाने शिबिरातून शेतकर्‍यांचे प्रबोधन करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या