मुंबई | Mumbai
बीडमधील (Beed) गुन्हेगारी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी ‘काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचेच दुष्परिणाम आज बीडमध्ये आपल्याला दिसत आहेत, असे म्हणत टीका केली आहे. तसेच शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्लाही त्यांनी माध्यमांशी बोलतांना दिला आहे.
यावेळी त्या म्हणाल्या की,”शरद पवार (Sharad Pawar) मागे म्हणाले होते की, धनंजय मुंडेंना आम्ही अनेक वेळा पाठीशी घातले. मात्र, शरद पवार यांनी जर आधीच नेत्यांना त्यांच्या चूका दाखवल्या असत्या अन् तिथल्या तिथेच शरद पवार यांनी त्यांना धडा शिकवला असता, तर हे सगळं आज घडताना दिसले नसते. आधीच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे कान का पकडले नाही? हे सगळं थांबवलं गेलं पाहिजे”, असा आक्रमक पवित्रा अंजली दमानिया यांनी घेतला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “बीडमध्ये जितके आमदार आहेत त्यातील एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे त्यांच्या पक्षातील होते. शरद पवार यांनी त्यांना काय केलं, त्यांनी काय शिकवले. जर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली तरच हे सगळं बंद होईल. सगळ्या पक्षांना गरज आहे की, त्यांनी सगळ्यावर कारवाई करावी आणि जो चुकीचा वागेल त्याच्यावर कठोर कारवाई करणे हे प्रत्येक पक्षाकडून अपेक्षित आहे. जर हे होत नसेल, हे थांबत नसेल, तर या पक्षांवर बहिष्कार टाका अशी देखील मागणी करणे गरजेचे आहे”, असं सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी म्हटले.
अजित पवारांवर टीकास्त्र
यावेळी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) निशाणा साधला. त्या म्हणाल्या की,”बीडच्या पालकमंत्रीपदाचा ते काय करत आहेत. त्यांनी सांगावं की ही जी सगळी प्रकरणे आहेत ती, जे सगळ्यांचे प्राण गेले त्यांचे नाव तरी माहिती आहेत का? पालकमंत्र्यांना त्याच्यावर काय कारवाई केली कोणाला निर्देश दिले.कोणालाही काम करायचे नाही आणि एकदा बीडला जाऊन आल्यानंतर अजित पवारांकडून एक चकार शब्दही ऐकलेला नाही”, असे त्यांनी म्हटले.