मुंबई | Mumbai
राज्याचे पावसाळी अधिवेशन अंतिम टप्प्यात असतानाच, गुरुवारी विधानसभा लॉबीमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.या राड्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला असून, आरोप-प्रत्यारोपाने राजकारण तापले आहे. या राड्या प्रकरणी दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आता या प्रकरणाची विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेतली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमधील वादावर अखेर विधानसभा अध्यक्षांनी कारवाईला सुरुवात केली आहे. विधिमंडळ सभागृह सुरक्षा समितीच्या अहवालानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही आमदारांनी खेद व्यक्त करावा अशा सूचनाही केल्या आहेत. आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांच्याशी संबंधित सर्जेराव बबन टकले (वय 37) आणि नितीन हिंदुराव देशमुख (वय 41) यांच्यावर फौजदारी करण्यात येत असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध चौकशी करुन विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्यासाठी विधानसभा विशेषाधिकार समितीकडे दोघांचे प्रकरण वर्ग करत आहे, असेही विधानसभा अध्यक्षांनी म्हटले.
विधानसभा अध्यक्ष काय म्हणाले?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, ‘दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे वृत्त विविध प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले. यात विधानमंडळातील विधानपरिषद सदस्य आणि विधानभवनातील सदस्यांविषयी टीकाटिप्पणी करण्यात आली आहे. ही बाब गंभीर आहे. ही घटना भवनाच्या आवारातच घडली आहे. यानंतर तातडीने विधीमंडळाचे सुरक्षा अधिकारी यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी अहवाल सादर केला. त्यात दोघांमध्ये हाणामारी सुरु झाली’. ‘दोघांची हाणामारी सुरक्षापथकाने तात्काळ थांबवली. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. नितीन देशमुख यांनी जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. तर गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे नाव सर्जेराव टकले असे आहे. त्याने गोपीचंद पडळकर यांचा मावसभाऊ असल्याचे सांगितले. या प्रकरणात ७-८ जणांवर मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गु्न्हा नोंदवण्यात आला आहे. या लोकांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येत आहे. काही जण अधिकृत प्रवेशिकेशिवाय विधीमंडळाच्या आवारात आले. त्यांनी हाणामारी करून आक्षेपार्ह कृत्य केले, असे नार्वेकर म्हणाले.
विधानमंडळाच्या प्रसिमेममध्ये अशी घटना यापूर्वी कधीही झालेली नाही. सदस्यांनी विधानमंडळात येताना कोणत्याही अनाहूत व्यक्ती व अभ्यंगत यांना विधिमंडळाच्या परिसरात आणण्याची कोणतीही आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. तसेच अभ्यांगत कोणत्याही कारणामुळे विधानभवनात आले तर त्यांच्या वर्तणुकीची जबाबदारी संबंधित सदस्याने घेणे आवश्यक आहे. कोणत्याही अभ्यांगताच्या आक्षेपार्ह वर्तणुकीसाठी सदस्यांवर जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.
या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने मी सर्व सदस्यांच्या निदर्शनास आणत आहे की, विधिमंडळाचे सदस्य म्हणून आपले कर्तव्य पार पडत असताना आपणावर विधिमंडळाच्या सर्वोच्च परंपरा राखण्याचे उत्तरदायित्त्व आणि जबाबदारी आहे. विधिमंडळाला लोकशाहीचे मंदिर संबोधले जाते. त्यामुळे, दोन्ही सदस्यांनी सभागृहात खेद व्यक्त कराव्या, अशा सूचनाही अध्यक्षांनी केल्या होत्या. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी या दोघांना सभागृहात आणल्याबद्दल सभागृहात खेद व्यक्त करावा, तसेच, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दखल घ्यावी, अशा सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




