छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar
औरंगजेबाच्या कबरीवरून वाद उफाळला असून, ती हटवण्याची मागणी विविध संघटनांकडून होत आहे. विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दलाने कबर न हटवल्यास बाबरीप्रमाणे कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कबर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त वाढवला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीजवळ सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस दल (SRPF) तैनात करण्यात आले असून, १५ पोलीस कर्मचारी आणि २ अधिकारी या भागात सतत गस्त घालत आहेत. कबर परिसरात जाणाऱ्या पर्यटकांची काटेकोर तपासणी केली जात आहे. तसेच, दोन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर औरंगजेबाच्या कबरीबाबत वाद उफाळला. गेल्या काही दिवसांत अनेक नेत्यांनी यावर परखड भूमिका घेतली आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीने वातावरण तापले आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सज्ज आहेत. काही पोलीस साध्या वेशातही नजर ठेवून आहेत.
बजरंग दलाने स्पष्ट इशारा दिला आहे की, औरंगजेबाची कबर लवकरात लवकर हटवली नाही तर राज्यभर आंदोलन छेडले जाईल. तसेच, प्रत्येक जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयाबाहेर एकाच दिवशी निदर्शने करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे. विश्व हिंदू परीषद आणि बजरंग दल यांनी स्टंटबाजी करू नये. औरंगजेब जेवढा क्रूर होता तेवढ्याच क्रूरपणे महाराष्ट्रातल फडणवीस सरकार वागत आहे. घाशीराम कोतवाल प्रमाणे गृहविभाग चालवले जात आहे. औरंगजेबाची कबर म्हणजे विरत्वाची कबर नाही तर ती कबर क्रूर पणाची आहे. त्यामुळे ती कबर शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देखील आहे.
या वादामुळे कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने अधिक खबरदारी घेतली आहे. सरकार आणि पोलीस यावर सतत नजर ठेवून असून, कोणत्याही अनुचित प्रकारास आळा घालण्यासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.