नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
राम मंदिर बांधले परंतु राम नावाचा शेतकरी आत्महत्या करतोय, त्याचं पाप फेडणार कुठे? महायुती सरकारने याचे उत्तर द्यावे. मंदिर बांधायचं आणि शेतकर्याला आत्महत्या करायला लावायचं, जनतेला कर्मकांडामध्ये अडकून ठेवायचं काम हे महायुती सरकार करत आहे, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर केली. नेवासा तालुक्यातील गळनिंब येथे माजी मंत्री बच्चू कडू यांची हुंकार सभा झाली. त्यात ते बोलत होते. श्री.कडू पुढे म्हणाले, हे सर्व थांबवायचे असेल, तर सर्व शेतकर्यांनी जात-धर्म बाजूला ठेवून एकत्र येऊन लढले पाहिजे, बेईमानाचे घ्यायचे नाही व ईमानदारीचे सोडायचे नाही, त्यासाठी आपण आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे आहे.
शाळा तसेच शिक्षण व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडवण्याचे काम या सरकारने केले आहे. शिक्षण महाग झाले आहे. या सर्व व्यवस्थेला आपल्याला तुडवावा लागेल, ही जातीभेदाची लढाई नसून अर्थभेदाची लढाई आहे.साखर महागते व उसाचे भाव तिथे राहतात. तुम्ही नेहमी कर्जबाजारी राहिले पाहिजे, अशी व्यवस्था या निर्दयी सरकारने करून ठेवली आहे. तुमच्या डोक्यामध्ये जात-धर्माचं भूत घालून तुमचं डोक बंद केलं आहे.
पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले. परंतु हे सर्व तुम्हाला जाणवत नाही. सरकार विरोधात तुम्ही लढू नये, रस्त्यावर उतरू नये, यासाठी वेळोवेळी सरकारने जात-धर्म यामध्ये तुम्हाला गुरफटून ठेवले आहे. लोकांनी एकत्र येऊन लढाई लढली पाहिजे. मी त्यासाठी ही हुंकार सभा नेवासा तालुक्यात घेत आहे. जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे, युवा जिल्हाध्यक्ष अड. पांडुरंग औताडे, बाळासाहेब खर्जुले, जालिंदर आरगडे, रघुनाथ आरगडे, मधुकर शिंदे, तालुकाप्रमुख अनिल विधाटे, संदीप पाखरे, अरविंद आरगडे, पांडुरंग नवले, राजेंद्र कळस्कर, आदिनाथ कडू, दिलीप मते, दादासाहेब शेळके, संतोष शेळके, तसेच गळनिंब ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.





