नाशिक | Nashik
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये (Nashik) अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर बोलतांना ‘जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावे. कर्ज घ्यायचे आणि पाच ते दहा वर्षे कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचे नाही. कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचे तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी आहेत. शेततळ्यासाठीही आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करते. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीकविम्याचे पैसे पाहिजेत, याचे पैसे पाहिजे. मग साखरपुडे करा, लग्न करा, असे वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्यावरून कोकाटे यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले होते.
त्यानंतर आता शेतकरी कर्जमाफीच्या (Loan Waive) मुद्द्यावर प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या उपस्थितीत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या निवासस्थानासमोर शुक्रवारी (दि.११) रोजी महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून रात्रीच्या सुमारास मशाल पेटवून आंदोलन केले जाणार आहे. तर राज्यातील विविध ठिकाणी देखील प्रहारचे कार्यकर्ते आंदोलन करतील अशी माहितीही बच्चू कडू यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले की, “राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांचे (Farmer) सरकारच्या धोरणामुळे नुकसान होत आहे. कर्जमाफीला सरकारकडे पैसे नाहीत, अपंगांना द्यायला पैसे नाहीत. कोकाटे हे कृषीमंत्री आहेत, शेतकऱ्यांचे पालकत्व त्यांच्याकडे आहे. तरी ते जबाबदारी झटक असतील तर त्यांची गाठ आमच्याशी आहे. ज्या सरकारच्या धोरणामुळे आमच्या शेतकर्यांच्या घरातील दिवे विझायला लागले त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार असून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर हातात मशाल पेटवून, गळ्यात निळा दुपट्टा आणि भगवा झेंडा घेऊन आंदोलन करण्यात येणार असल्याचे बच्चू कडू म्हटले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elections) आधी महायुतीने (Mahayuti) जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी या विषयाचा उल्लेख होता. तसेच महायुतीच्या नेत्यांनी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करु असे आश्वासनं दिले होते. मात्र, अद्यापही कर्जमाफीबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह प्रहार संघटना देखील आक्रमक झाली आहे.