नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बांगलादेशात मागील काही दिवसांपासून मोठा हिंसाचार सुरु आहे. अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यात आल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली. तसेच ठिकठिकाणी जाळपोळ आणि मारहाणीच्या असंख्य घटना घडल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याच्या २,९०० घटना मागच्या काळात घडल्या आहेत. दरम्यान, संकटात सापडलेल्या बांगलादेशात अडकलेले हिंदू नागरिक दहशतवादापासून वाचण्यासाठी भारताला त्यांच्या सीमा उघडण्याची विनंती करत आहेत.
बांगलादेशमधील रंगपूर, चितगाव, ढाका आण मैमनसिंग येथे वास्तव्यास असेलल्या हिंदूंच्या गटाशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला. देशद्रोहाचा आरोप असलेले बांगलादेश सनातन मंचचे नेते निहार हलदर आणि माजी इस्कॉनचे भिक्षू चिन्मय कृष्ण दास यांच्या मदतीने हिंदू नागरिकांशी मोबाइलवरून संवाद साधला गेला.
रंगपूर येथील एक रहिवासी म्हणाले की, त्यांच्या धर्मामुळे त्यांना सतत अपमान सहन करावा लागत आहे. रस्त्यावर चालताना त्यांना ऐकू येणारे टोमणे लवकरच मॉब लिंचिंगमध्ये बदलू शकतात, असेही त्यांनी सांगितले. आम्ही इथे कचाट्यात सापडलो असून सुटकेचा कोणताच मार्ग दिसत नाही. दीपू चंद्र दास आणि अमृत मोंडलसारखी परिस्थिती ओढवण्याची भीती असल्यामुळे आम्ही अपमान गिळून जगत आहोत”, अशी भीती या वृद्धाने व्यक्त केली.
हे ही वाचा: Pune NCP: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसची प्रस्तावित युती फिस्कटली? ‘या’ कारणांमुळे पडला मीठाचा खडा
ढाक्यातील आणखी एका हिंदू रहिवाशाने सांगितले की, दीपू दास यांच्या लिंचिंगमुळे भीती निर्माण झाली आहे, तर माजी राष्ट्रपती खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांचे बांगलादेशात परतणे त्यांना आणखी चिंतेत टाकते. जर बीएनपी सत्तेत आली तर आपल्याला आणखी छळाला सामोरे जावे लागू शकते. शेख हसीनांची अवामी लीग ही आमची एकमेव रक्षक होती.
सनातन जागरण मंचाच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, बांगलादेशमध्ये २.५ कोटी हिंदू आहेत. ही संख्या छोटी नाही. भारतातील हिंदू संघटना केवळ तोंड चालविण्यापलीकडे काहीही करत नाहीत. आम्ही एका मोठ्या प्रलयाच्या तोंडाशी येऊन ठेपलो आहोत.




