मुंबई । Mumbai
मराठीच्या मुद्द्यावर मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर आज तब्बल 19 वर्षानंतर मुंबईत (Mumbai) ठाकरे बंधू एकत्र आले. या मेळाव्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मराठीच्या मुद्द्यावरुन भाषण करत उपस्थितांची मने जिंकली. तर, राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाषण करुन राजकीय फटकेबाजी केली. उद्धव ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरुन भाजप आणि मोदी सरकारला लक्ष्य केलं. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवरही बोचरी टीका केली.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर आता भारतीय जनता पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपाचे नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर (द्विटर) एक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच त्यांचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटले आहे की, मराठीच्या गोंडस नावाखाली आज उद्धव ठाकरे यांनी वरळीत सत्ता गेल्याचं शोकगीत गायलं. पण मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला, याचं उत्तर त्यांनी दिलंच नाही. ‘मराठी भाषा’ ही केवळ भावनांमध्ये उभी राहणारी अस्मिता नाहीतर ती धोरणात दिसली पाहिजे. पण तुम्ही मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं. आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा मराठीवर बेगडी प्रेम करत आहात.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट होतंय की, त्यांचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे! यांचं मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की आठवण येणारी राजकीय नौटंकी आहे. जनतेनं आता हा दुटप्पीपणा ओळखला आहे, असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.




