नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यातील ट्रॉफीवरून BCCI आणि आशियाई क्रिकेट परिषद यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानला हरवून विजेतेपद मिळवलेल्या भारतीय संघाला ट्रॉफी न दिल्याच्या निषेधार्थ बीसीसीआयने आता थेट एसीसीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांना ट्रॉफी भारताला परत करण्याची मागणी करणारा अधिकृत ईमेल पाठवला आहे.
बीसीसीआयने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना पत्र लिहून या प्रकरणी इशारा दिल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयने आपल्या पत्रात म्हटले आहे की जर मोहसिन नक्वी यांनी आशिया चषक ट्रॉफी भारताला दिली नाही तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.
बीसीसीआयने आपल्या पत्रात म्हंटले आहे की, आशिया चषक ट्रॉफी भारताकडे सोपविण्याबाबत जर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तर हे प्रकरण आयसीसीकडे नेण्यात येईल. यासंदर्भात बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी माहिती दिली की, BCCI हा संपूर्ण विषय टप्प्याटप्प्याने आणि अधिकृत प्रक्रियेने हाताळत आहे आणि ते हा मुद्दा सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहतील. सध्या आशिया चषकाची ट्रॉफी दुबईतील ACC कार्यालयात ठेवलेली आहे, कारण अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाने मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता.
BCCI चे सचिव देवजीत सैकिया यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ते सध्या नक्वी यांच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहेत. जर त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही, तर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) अधिकृतरित्या नेण्यात येईल. सैकिया यांनी स्पष्ट केले की, BCCI हा संपूर्ण विषय टप्प्याटप्प्याने आणि अधिकृत प्रक्रियेने हाताळत आहे आणि ते हा मुद्दा सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहतील.
नेमका वाद काय आहे?
आशिया कपचा अंतिम सामना जिंकल्यानंतर सादरीकरण समारंभात भारतीय खेळाडूंनी एसीसीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याकडून पदके आणि ट्रॉफी घेण्यास नकार दिला. यानंतर नक्वी यांनी एसीसी अधिकाऱ्यांना ट्रॉफी घेऊन दुबईतील एसीसी कार्यालयात घेऊन जाण्याचे आदेश दिले. त्यामुळे, सध्या आशिया कपची ट्रॉफी दुबईतील एसीसी कार्यालयात आहे.
भारताने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याचे टाळले आणि वाद उफळला
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानसोबत खेळू नये, अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही आशिया चषक स्पर्धेत तीन वेळा आमनेसामने आल्यावर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले होते. तर दुसरीकडे पाकिस्तानी खेळाडूंनी वारंवार 6-0 असे हावभाव करत ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने सहा भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा खोटा दावा करताना दिसले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




