राहाता |प्रतिनिधी| Rahata
भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन काल शनिवारपासून सुरू करण्याच्या सूचना ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्याना दिल्या आहेत. साधारण एका आठवड्याचे नियोजन या आवर्तनातून करण्यात आले असल्याने लाभक्षेत्रातील गावातील पिण्याच्या पाण्यासाठी असलेले साठवण तलाव भरून घेण्यास मदत होईल. सद्य स्थितीत काही तालुक्यातील गावांमधील पाणी पुरवठा करणार्या तलावांमध्ये पाण्याची घट झाल्याने त्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी निर्माण झाला आहे.
या आवर्तनामुळे या गावांमधील साठवण तलाव, बंधारे भरुन घेवून पाणीटंचाई दूर करण्यात थोडी मदत होईल. या तलावावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनाच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील गावांचा पिण्याचा प्रश्न सुटण्यास दिलासा मिळेल. आवर्तनाच्या दरम्यान जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले असून शेवटच्या गावापर्यंत पाणी मिळेल याची काळजी घेण्याच्या सूचना ना. विखे यांनी दिल्या आहेत.