भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणार्या भंडारदरा धरण पाणलोटात पावसाचा जोर कायम असल्याने नवीन पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग वाढविण्यात आला असून सायंकाळी 8833 क्युसेकने प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. तर निळवंडे धरणातील पाणी साठाही 55.67 टक्के झाला आहे.
भंडारदरा परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे हवेत गारवा वाढला असून कळसूबाई शिखर, कोकणकडा परीसरात धुक्यात असून निसर्ग सौदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर टिकून राहिल्याने धरणाचा पाणीसाठा काल सायंकाळी सहा वाजता 9257 दलघफू (83.86 टक्के) होता. मात्र, पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून 8833 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. काल दिवसभर धरणाच्या पाणलोटात पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळी पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे विसर्ग वाढविला जाऊ शकतो अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.
भंडारदरा धरणातून सोडण्यात येत असलेले पाणी निळवंडे धरणात विसावत असल्याने पाणीसाठा 4636 दलघफू (55. 67 टक्के) झाला आहे.
गेल्या 24 तासात झालेल्या पावसाची आकडेवारी मिमी मध्ये पुढीलप्रमाणे भंडारदरा 57 मिमी, घाटघर 156 मिमी, पांजरे 69 मिमी, रतनवाडी 83 मिमी, वाकी 39 मिमी, तर 12 तासात भंडारदरा येथे 35 मिमी पावसाची नोंद झाली आहे.