पुणे | Pune
‘लाडकी बहीण’ योजना सुरू करताना निकष तपासण्यासाठी पुरेसा कालावधी न मिळाल्याने सरकारी नोकरी असलेले, घरी कार असलेले आणि अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेले लाभार्थीही या योजनेचा लाभ घेऊ शकले. या योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत असून, या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत. सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचे होते,’ अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ‘योजनेतील अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू असून, गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
हा लाभ घेतलेल्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र, आता अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात येत आहे. सरसकट सर्वांना लाभ देणे ही चूकच झाली, अशी कबुली उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.
लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा निवडणुकीमुळे अर्ज पडताळणीसाठी कमी अवधी होता. निवडणूक आणि आचारसंहितेमुळे अर्ज तपासायला वेळ मिळाला नाही. मासिक उत्पन्न जास्तीत जास्त वीस हजार आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र होत्या. ही योजना लागू होणार नाही, अशा काही महिलांनी अर्ज केले. त्यांना मिळालेले पैसे परत घेण्याचा प्रश्न नाही; परंतु यापुढे केवळ पात्र महिलांना मदत दिली जाईल,’ असे पवार म्हणाले.
तेव्हा वाटले की, या निकषात न बसणारे अर्ज करणार नाहीत, मागणी करणार नाहीत. मात्र, काही जणांनी अर्ज केले आणि लाभ घेतला. दिलेले पैसे काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही. आता त्याची व्यवस्थित माहिती घेऊन, खरोखरच ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळायला पाहिजे, त्याच लाभार्थ्यांना ही योजना सुरू ठेवली जाणार आहे.
शस्त्र परवाने तपासले जातील
यावेळी अजित पवार यांनी पुण्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी हगवणे बंधुंना दिलेल्या शस्त्र परवान्याविषयी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, पुणे शहरामध्ये अशाप्रकारे कोणकोणाला शस्त्र परवाना देण्यात आला आहे, हे तपासले जाईल. मधल्या काळात मी बीडचा पालकमंत्री झालो तेव्हा अशा तक्रारी आल्या तेव्हा तिथल्या एसपींनी फेरआढावा घेतला. अनेकांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले. २०२० ते २०२३ कोणाकोणाला लायसन्स दिली गेली, याचा तपास करु. त्यांची पार्श्वभूमी तपासली जाईल. ज्यांना गरज असेल त्यांचेच शस्त्र परवाने ठेवू. लायसन्स देण्याचा जसा अधिकार आहे तसा तो रद्द करायचाही आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांबद्दल बोलताना भान ठेवा
पवार म्हणाले, ‘माणिकराव कोकाटे यांना यापूर्वीही शेतकर्यांबाबत बोलताना अशा प्रकारचे वक्तव्य करू नये, असे सांगितले होते. सगळ्याच गोष्टी आम्हाला माहीत आहेत. मीसुद्धा शेतकरी असून, काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात. त्या मनात ठेवायच्या असतात. कोकाटे यांना मनात गोष्टी ठेवायची सवय नाही. हे असले वक्तव्य मलाही फार महागात पडते, असा टोलाही त्यांनी लगावला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा