बिहार | Bihar
भारतीय जनता पार्टी, संयुक्त जनता दल व एनडीएतील त्यांचे मित्रपक्ष, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल व त्यांच्या महागठबंधनमधील मित्रपक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. नितीश कुमार, तेजस्वी यादव, प्रशांत किशोर हे बिहारच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत आहेत, प्रचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील प्रचारात मागे राहिलेले नाहीत. ते देखील बिहारमध्ये भाजपासह एनडीए उमेदवारांचा प्रचार करत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरा येथील जाहीर सभेतून काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) वर कठोर शब्दात टीका केली आहे.
पंतप्रधान मोदींकडून ऑपरेशन सिंदूरचा पुनरुच्चार
पंतप्रधान मोदी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानमध्ये झाले, पण काँग्रेसच्या शाही घराण्याची रात्रीची झोप उडाली. पाकिस्तान आणि काँग्रेसचे नामदार आजही ऑपरेशन सिंदूरच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. जेव्हा देशाची सुरक्षा दलं विजय मिळवतात, तेव्हा विरोधक त्यांच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यामुळे देशाची प्रतिमा खराब होते,” अशी टीका पंतप्रधानांनी केली.
मोदींनी दावा केला की, “बिहारमधील महाआघाडी (RJD–काँग्रेस–इतर) मध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारावरून प्रचंड मतभेद आहेत. नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेच्या आधी दरवाजे बंद करून मोठा ‘राजकीय व्यवहार’ झाला. काँग्रेस राजदच्या नेत्याला मुख्यमंत्री चेहरा घोषित करू इच्छित नव्हती, पण दबावाखाली ते मान्य करावे लागले. जर निवडणुकीपूर्वीच एवढे वाद आहेत, तर निवडणुकीनंतर काय होईल?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“काँग्रेस व राजदमध्ये नुकतीच चर्चा झाली. खरंतर मुख्यमंत्रिपदासाठी राजदच्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब व्हावं अशी काँग्रेसची कधीच इच्छा नव्हती. परंतु, राजदनेही संधी सोडली नाही. राजदने काँग्रेसच्या कानपट्टीवर बंदूक ठेवून मुख्यमंत्रिपदाची चोरी केली. त्यांनी काँग्रेसलाच घोषणा करायला लावली. जबरदस्तीने मुख्यमंत्रिपदासाठी राजदच्या उमेदवाराला समर्थन देत असल्याची घोषणा करायला लावली. कानवर बंदूक ठेवून वदवून घेतलं.”
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात राजदच्या सत्ताकाळाची तुलना सध्याच्या एनडीए सरकारशी केली. ते म्हणाले, “राजदच्या काळाला ‘जंगलराज’ म्हटले जायचे, जे क्रूरता, बंदूकशाही, अंधश्रद्धा आणि भ्रष्टाचाराचे प्रतीक होते. मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि एनडीए सरकारने बिहारला त्या अंधारातून बाहेर काढले. बिहारला पुन्हा जुन्या अराजकतेत नेऊ देऊ नका. आजचा बिहार विकास आणि सुशासनाच्या मार्गावर आहे.”
“मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय ते लक्षात ठेवा राजद व काँग्रेसमध्ये मोठं भांडण चालू आहे. महागठबंधनने जो निवडणुकीच्या आश्वासनांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे तो बनवताना राजदने काँग्रेसचे काहीच ऐकले नाही. प्रचार करताना देखील त्यांनी काँग्रेसला विचारले नाही.”
पंतप्रधान मोदींनी आरोप केला की, “बिहारच्या संसाधनांवर बिहारच्या लोकांचा अधिकार असावा, पण काही पक्ष त्यावर बाहेरील लोकांचा कब्जा करून देतात. जे घुसखोरांचे रक्षण करतात, ते बिहारसाठी धोकादायक आहेत. जे पक्ष पूर्वी उद्योग बंद करत होते, ते आता नवीन उद्योग आणतील का? गुंतवणूकदार ‘लालटेन’ (राजदचे चिन्ह) आणि ‘लाल झेंडा’ (भाकपा-मालेचे चिन्ह) पाहून घाबरतात. बिहारमध्ये उद्योग आणि रोजगार फक्त एनडीएच देऊ शकते.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




