अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर आणि बुलढाणा जिल्ह्यात दुचाकी, चार चाकी वाहनांची चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. या टोळीतील तीन आरोपींकडून दहा वाहनांसह 25 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात वाढलेल्या वाहन चोरीच्या घटनांचा तपास करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक रोकेश आला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपासाचे काम सुरू केले. दरम्यान, वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी समाधान देविदास राठोड (रा. बोलकी कोपरगाव) हा साथीदारांसह वाहन चोरीचे गुन्हे करत असून चोरीचे वाहन व मोटार सायकल विक्रीसाठी नगरच्या एमआयडीसी परिसर येथे येणार आहे. मिळालेल्या माहितीवरून पथकाने शनिवार (दि.19) रोजी एमआयडीसी बायपास परिसर येथे सापळा रचत आरोपींचा शोध घेत असताना काही संशयित व्यक्ती पांढर्या रंगाच्या इरटिगा व मोटार सायकलवर थांबलेले दिसून आले.
पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी यांनी पंचासमक्ष या संशयित इसमांना ताब्यात घेताना यातील दोन आरोपी पळून गेले. पथकाने याठिकाणी समाधान राठोड (वय 25, रा. बोलकी, हल्ली रा. बोल्हेगाव फाटा, नगर), दादासाहेब दिलीप बावचे, (वय 28, रा. सावळीविहीर, ता. राहाता) आणि बाबा उर्फ आकाश रमेश बर्फे, (वय 24, रा. तिनचारी, कोकमठाण, ता. कोपरगाव) यांना जागेवर ताब्यात घेतले. पंचासमक्ष या आरोपीकडे पळून गेलेल्या आरोपींबाबत विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचे नाव सोमा उर्फ वैभव बाबासाहेब सुरवडे, (रा. परफेक्ट टायर शोरूममागे, बोल्हेगाव फाटा नगर), रोहन अनिल अभंग, (रा. देवाचा मळा, संगमनेर) असल्याचे सांगितले.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातील मोटार सायकल व इरटिगा क्रमांक एमएच 04 जीएन 5777 बाबत विचारपूस केली असता, आरोपी बावचे याने इरटिगा गाडी माझ्या मालकीची असून तिचा वापर आम्ही कोल्हार येथे मोटार सायकल चोरी करताना केला असल्याचे सांगितले. तसेच आरोपीतांकडे आणखी काही वाहने चोरीबाबत विचारपूस केली असता, त्यांनी चोरी केलेले दोन ट्रॅक्टर, दोन अॅक्टीव्हा व एक पल्सर अशी वाहने एमआयडीसी बायपास रोडलगत ठेवलेल्या असल्याचे सांगितले.
यावेळी आरोपीतांकडून 25 लाख 40 हजार रुपये किंमत त्यात 1 मारूती सुझुकी कंपनीची इरटिगा, 1 होंडा कंपनीची युनिकॉर्न, 2 इनफिल्ड कंपनीची बुलेट, 3 होंडा कंपनीची अॅक़्टीवा, 1 जॉनडियर कंपनीचा ट्रॅक्टर, 1 स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर, 1 पल्सर मोटार सायकल अशी दहा वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. ही कामगिरी अनंत सालगुडे व बापूसाहेब फोलाणे, अतुल लोटके, गणेश धोत्रे, शाहीद शेख, रणजीत जाधव, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ व चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली आहे.