शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विधानसभेपेक्षाही मोठा विजय झाला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले. भारतीय जनता पक्षाच्या शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदेश अधिवेशनाचा समारोप केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झाला. महायुतीला ऐतिहासिक यश मिळवून दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आणि उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानून महाराष्ट्राच्या निकालाने देशाला नवा संदेश दिला असल्याचे उद्गारही त्यांनी काढले. विधानसभा निवडणूक ही केवळ महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी किंवा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी नव्हती तर विचाराला सोडून राजकारण करणार्या उध्दव ठाकरेंना त्यांची जागा दाखविण्यासाठी होती, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी अमित शहा म्हणाले, स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी विजयी व्हायचं आहे. खर्या शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही विजय मिळवला आहे. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र भाजपसाठी महत्वाचा आहे. ज्यांना श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत बुरी झाली, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजपला विजय मिळाला, असे म्हणत फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. फडणवीस यांनी महाभारतातील किस्सा सांगत नरेंद्र मोदी यांनी माधव आणि मतदारांना केशव अशी उपमा दिली. या केशव आणि माधव यांच्यामुळेच आपल्याला निवडणुकीच्या युद्धा विजय मिळाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तीन-चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून भाजपाला महाविजय मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहनही त्यांनी केले.
शरद पवारांच्या दगाफटक्याच्या राजकारणाला जमिनीत गाडलं, उद्धव ठाकरेंवरही टीका !
1978 पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं तेसुद्धा जमिनीमध्ये गाडण्याचं काम जनतेने केलं आहे. उद्धव ठाकरेंनी 2019 ला विचारधारा सोडून दगा देत खोटं बोलून मुख्यमंत्री झाले होते त्यांनाही लोकांनह जागा दाखवून दिली आहे. 1978 पासून 2024 पर्यंत अस्थिर राजकारण संपवत स्थिर फडणवीस सरकार देण्याचं काम केलं आहे. लोकसभेनंतर महाराष्ट्रातही विजय होईल विरोधकांच्या या स्वप्नाला धुळीस मिळवलं आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि अजित पवार यांचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेेस पार्टी असल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिल्याचे अमित शहा म्हणाले.