मुंबई | प्रतिनिधी Mumbai
मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप-शिवसेना शिंदे गट महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या २६ बंडखोरांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या या बंडखोरांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ही कारवाई केली.
मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गट यांना सोबत घेतले आहे. या महायुतीमुळे भाजपला मित्र पक्षांना जागा सोडाव्या लागल्या. त्यामुळे उमेदवारी न मिळालेल्या भाजपच्या इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकवत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. मुंबईतील भाजपचे नेते आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी या बंडखोरांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उमेदवारी मागे घेण्याची पक्षाची विनंती त्यांनी धुडकावून लावली. त्यामुळे अखेर भाजपने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला.
निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या भाजप बंडखोरांमध्ये प्रभाग क्रमांक ६० च्या दिव्या ढोले, प्रभाग क्रमांक १७७ च्या नेहल अमर शहा, प्रभाग क्रमांक २०५ च्या जानव्ही राणे, प्रभाग क्रमांक २ च्या आसावरी पाटील, प्रभाग क्रमांक १६६ चे मोहन आंबेकर, प्रभाग क्रमांक ७३ च्या स्नेहाली वाडेकर, प्रभाग क्रमांक १३१ च्या धनश्री बगेल, प्रभाग क्रमांक ७४ च्या प्रिया मर्गज, प्रभाग क्रमांक १५९ च्या शोभा साळगावंकर, प्रभाग क्रमांक ३७ च्या सुचित्रा नाईक, प्रभाग क्रमांक ६१ च्या उर्मिला गुप्ता आदींचा समावेश आहे.
भाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे काही बंडखोरांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. मात्र, माघारीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. सुनीता यादव यांनी प्रभाग क्रमांक १ मधून अधिकृत उमेदवार रेखा यादव यांच्या विरोधात अर्ज भरला होता. मात्र, पक्षाच्या विनंतीनंतर त्यांनी तो मागे घेतला. प्रभाग क्रमांक २२१ मध्ये माजी नगरसेवक जनक संघवी यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार आकाश पुरोहित यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नंतर त्यांनी माघार घेतली, अशी माहिती मुंबई भाजपच्या सूत्रांनी दिली




