मुंबई | Mumbai
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याचा दावा काँग्रेसकडून (Congress) करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले असून गृहमंत्री शाह यांच्या विधानाचा ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजप अमित शाह यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केल्याची घटना घडली आहे.या घटेनमुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
भाजप युवा मोर्चाच्या (BJP Yuva Morcha) कार्यकर्त्यांनी काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा दावा करत मुंबईतील काँग्रेसच्या मुख्यालयावर हल्ला (Attack) केला. काही भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आज प्रेस क्लब येथील काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी सुरुवातीला राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर शाहीफेक केली. त्यानंतर तेथील खुर्च्या फेकून देण्यात आल्या. यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात दगडेही मारली.
दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संविधान वाचवणाऱ्यावर हे लोक आता हल्ला करत आहेत. संविधान मानणाऱ्यांवर हल्ला करत आहेत. आज राहुल गांधींवर (Rahul Gandhi) संसदेत हल्ला केला. आता त्यांनी मुंबई कार्यालयावर हल्ला केला. हिंमत आहे तर सूचना देऊन यायचं होतं. चोराप्रमाणे का आलात? पोलिसांना माहित होतं, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली. तसेच या घटनेची पोलिसांनी (Police) गंभीर दखल घेत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर जोरदार लाठीचार्ज केला. परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी पोलिसांकडून हा लाठीचार्ज करण्यात असल्याचे सांगितले जात आहे.