मुंबई । Mumbai
देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत महायुतीने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, मुंबईवर महायुतीची सत्ता येणे जवळपास निश्चित झाले असून भाजपने या निवडणुकीत मोठी मुसंडी मारली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र येत महायुतीला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. विशेष म्हणजे, महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा मिळत असल्याने मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच असेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांसाठी झालेल्या या लढतीत बहुमतासाठी ११४ हा आकडा गाठणे आवश्यक आहे. ताज्या आकडेवारीनुसार, महायुतीने १२७ जागांवर आघाडी मिळवत बहुमताचा टप्पा पार केला आहे. यामध्ये भाजपने एकहाती ९६ जागांवर आघाडी घेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने ३१ जागांवर आघाडी घेतली आहे.
दुसरीकडे, ठाकरे बंधूंच्या युतीला (शिवसेना उबाठा आणि मनसे) ७१ जागांवर समाधान मानावे लागत असल्याचे दिसत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ६२, तर राज ठाकरे यांच्या मनसेने ९ जागांवर आघाडी घेतली आहे. स्वबळावर लढलेल्या काँग्रेसला १३, तर राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या २ जागांवर आघाडी मिळाली आहे.
या निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. काँग्रेसच्या उमेदवार आशा काळे यांनी धारावीतून विजय मिळवत पक्षाचे पहिले खाते उघडले. तसेच, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर आणि नवनाथ बन यांनीही आपापल्या प्रभागात विजय मिळवून भाजपची ताकद अधोरेखित केली आहे. दुसरीकडे, एमआयएमनेही मुंबईत आपली उपस्थिती दर्शवत ४ जागांवर विजय मिळवला आहे.
विजयी उमेदवारांची नावे (वॉर्ड क्रमानुसार):
भाजप: तेजस्वी घोसाळकर (वॉर्ड २), प्रकाश तावडे (वॉर्ड १९), दीपक तावडे (वॉर्ड २०), विक्रम राजपूत (वॉर्ड ५०), हेतल गाला (वॉर्ड १०३), प्रकाश गंगाधरे (वॉर्ड १०४), नवनाथ बन (वॉर्ड १३५), राजश्री शिरवाडकर (वॉर्ड १७२), शिल्प केळुस्कर (वॉर्ड १७३), अजय पाटील (वॉर्ड २१४), संतोष ढोले (वॉर्ड २१५).
शिवसेना (ठाकरे गट): गीता भंडारी (वॉर्ड ३२), योगिता कदम (वॉर्ड ३७), जितेंद्र वळवी (वॉर्ड ५३), लोना रावत (वॉर्ड ७३), पूजा महाडेश्वर (वॉर्ड ८७), सुनील मोरे (वॉर्ड १२३), सकिना शेख (वॉर्ड १२४), मिलिंद वैद्य (वॉर्ड १८२), निशिकांत शिंदे (वॉर्ड १९४), उर्मिला पांचाळ (वॉर्ड २००).
शिवसेना (शिंदे गट): रेखा यादव (वॉर्ड १).
काँग्रेस: आशा काळे (वॉर्ड १८३), अश्रफ आझमी (वॉर्ड १६५), मोईन सिद्दिकी (वॉर्ड ३३).
एमआयएम: खैरुनिसा हुसेन (वॉर्ड १४५), मेहजबीन खान (वॉर्ड १३४).
राज्यातील इतर महानगरपालिकांमध्येही महायुतीने चांगली कामगिरी केली असून, मुंबईत तब्बल दोन दशकांनंतर शिवसेनेचा (ठाकरे गट) गड ढासळताना दिसत आहे. विकासाच्या मुद्द्यावर आणि महायुतीच्या एकत्रित ताकदीमुळे मुंबईकरांनी हा कौल दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.




