मुंबई | Mumbai
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपा जरी मुंबई महापालिकेत मोठा पक्ष ठरला असला तरीही एकहाती सत्ता महापालिकेत मिळाली नाही. एकनाथ शिंदे यांच्या नगरसेवकांची मदत घेतल्याशिवाय भाजपा सत्ता स्थापन करू शकणार नाही. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले. असे असताना नगरसेवकांची पळवापळव होणार की काय, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच, शिंदेंच्या शिवसेनेने आपल्या २९ नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, ठाकरेंकडून शिंदेंचे नगरसेवक फोडले जाण्याची भीतीही व्यक्त होत आहे. मात्र, शिवसेना नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवले, याबद्दल शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
भाजपचे ८९ नगरसेवक निवडून आल्याने त्यांना ११४ हा मॅजिक फिगरचा आकडा गाठण्यासाठी एकनाथ शिंदे यांची मदत घेणे अपरिहार्य आहे. हीच गरज ओळखून एकनाथ शिंदे यांच्याकडून अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला जाऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाची समान वाटणी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात करावी. तसेच स्थायी समिती व इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांना योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नगरसेवकांसाठी दोन दिवसीय शिबिर घेतले आहे
आम्ही महायुती म्हणून लढलो आणि जिंकलो आहोत, पाठीत खंजीर खुपसण्याची आमची भूमिका नाही. महायुती म्हणूनच सत्तेत येणार अशी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी बोलून दाखवली. तसेच, नगरसेवकांना हॉटेलवर ठेवण्यात आल्यासंदर्भातही त्यांनी माहिती दिली. आमचे जवळपास २० नगरसेवक हे नवखे आहेत, त्यांना मनपाचे कामकाज माहीत नाही. त्यामुळे, त्याच संदर्भाने आम्ही नगरसेवकांसाठी दोन दिवसीय शिबिर घेतले आहे, त्यासाठी हे नगरसेवक हॉटेलमध्ये आहेत. हे उबाठाच्या नगरसेवकांना हरवून आलेत, असेही शीतल म्हात्रे यांनी सांगितले. महायुती ही बाळासाहेब यांनी केलेली नैसर्गिक युती आहे, बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठीचा हा विषय नाही. तसेच, महापौर पदाचा निर्णय महायुतीचे नेते घेतील, असेही म्हात्रे यांनी म्हटले.
एवढी वर्षे मातोश्रीची भाकरी खाऊन सिल्व्हर ओकची चाकरी केली
शीतल म्हात्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “एवढी वर्षे मातोश्रीची भाकरी खाऊन सिल्व्हर ओकची चाकरी केली. आता काकांनी चाकरी आणि मातोश्रीने भाकरी बंद केली वाटते, त्यामुळे बहुतेक ताजमध्ये जेवायला येताय. खाल्ल्या मिठाला जागायची सवय तेवढी लावून घ्या!” सगळ्यांना खड्ड्यात घातले, खासदारकी संपत आली आहे. तीही शिंदेंच्या कृपेमुळे आली होती. नगरसेवकांना मस्का मारायला येणार असतील की मला शिंदेंकडे घेऊन चला, असा टोला शितल म्हात्रेंनी लगावला.




