Saturday, July 27, 2024
Homeनगर‘लाचलुचपत’च्या कायद्यात बदल करण्याची गरज - ना. विखे

‘लाचलुचपत’च्या कायद्यात बदल करण्याची गरज – ना. विखे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात महसूल सप्ताह चालू असताना नाशिकमध्ये तहसीलदार लाच घेतो, ही शरमेची बाब आहे. वास्तविक पाहता भ्रष्टाचार केल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. लाच घेतल्यानंतरही अनेकांना आपण लवकर सेवेमध्ये घेतो. त्यामुळेच बहुतेक म्हणावा असा त्यांना फरक पडत नाही, त्यामुळे असे प्रकार वाढत चाललेले आहेत. भविष्यामध्ये लाच घेतल्यानंतर त्याला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, त्याकरिता आता कायद्यात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून निश्चितपणे आगामी काळामध्ये यावर निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

- Advertisement -

येत्या शुक्रवारी (दि. 11) शिर्डी येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यादृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या तयारीचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी काल (मंगळवारी) येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यानंतर आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे आदी यावेळी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, जर एखादा अधिकारी, कर्मचार्‍याने लाच घेतल्यानंतरही त्यांना त्याचे काही सोयरसुतक वाटत नसेल तर आता वेळप्रसंगी नियमात बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यासह राज्यभरात महापुरूषांविषयी वारंवार होणार्‍या आक्षेपार्ह वक्तव्यविषयी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, भिडे गुरूजींनी जे वक्तव्य केले त्यानंतर त्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्याबाबत मी पुन्हा बोलणार नाही, पण नगर जिल्ह्यामध्ये लव जिहाद, वादग्रस्त वक्तव्य अशा सलग घडलेल्या घटना पाहता या घटनांच्या संदर्भात पोलीस प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. अनेक ठिकाणी जातिवाद देण्याचा प्रयत्न झाला पण काही ठिकाणी यश आले नाही.

महापुरूषांच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य करतात त्यांच्यावर सुध्दा आता कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. आगामी काळामध्ये नगर येथील घटकांच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यासाठी आपण लवकरच जिल्हा प्रशासनासमवेत बैठक घेणार असून त्यांना त्या बैठकीमध्ये अंतिम सूचना या संदर्भात करणार आहे. तसेच या घटनेत नुसतेच पोलीस अधिकारी जबाबदार नसून तर कर्मचारी सुध्दा जबाबदार धरले जातील. जर एवढे होऊन देखील सुध्दा स्थानिक पातळीवर असे प्रकार थांबले नाही, तर आम्हाला राज्य पातळीवरून कारवाई करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

शुक्रवारी शिर्डीत ‘शासन आपल्या दारी’

शुक्रवारी (दि. 11) शिर्डी येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींसह जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे हा शासन आपल्या दारीचा उद्देश आहे. 30 हजार लाभार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून त्यांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील आमदारांना निधी देण्यासाठी आपण पुन्हा विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कुणीही या कार्यक्रमाला विरोध दर्शवला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हा कार्यक्रम नगर या ठिकाणी घेण्याचे नियोजन सुरूवातीला होते. हवामानातील बदल पाहता तो शिर्डी या विमानतळाच्या ठिकाणी घ्यावा असा निर्णय झाल्याने, तो शिर्डी येथे होत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या