श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
भारत राष्ट्र समिती पक्षाचे (बीआरएस) तेलंगणातील जहीराबाद येथील खासदार बी.बी.पाटील यांनी अशोक साखर कारखान्याचे चेअरमन, लोकसेवा विकास आघाडीचे संस्थापक माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या निवास्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी तेथे स्नेहभोजनही घेतले. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हेही उपस्थित होते. यावेळी सत्काराची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
बीआरएसचा श्रीरामपुरात शिरकाव झाल्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता खासदार बी.बी.पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तेलंगणात झालेला विकास आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच नगर जिल्ह्यातही पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न चालविले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर अचानकपणे खा. पाटील यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी स्नेहभोजनाचा आस्वादही घेतला. यावेळी खा. सदाशिव लोखंडे हेही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चाही झाली. या दोन्ही नेत्यांनी खा. पाटील यांचा सत्कार केला. याप्रसंगी अकोलेतील झेडपीचे माजी सदस्य बाजीराव दराडे संभाजीनगरचे बाळासाहेब सानप, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम, सुवर्णा काटे, बाळासाहेब सानप उपस्थित होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची तेलंगणात राबविलेल्या शेतकरी योजनांची पाहणी करण्यासाठी तसेच माहिती घेण्यासाठी माजी आ. मुरकुटे दौर्यावर गेले होते. या भेटीमुळे त्यावेळी श्री. मुरकुटे बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला तालुक्यात उधाण आले होते. मात्र सध्या तसे काही ठरले नाही, येथील सरकार शेतकर्यांसाठीच्या योजना कशा पद्धतीने राबविते या योजनांची पाहणी व माहिती घेण्यासाठीचा हा दौरा असल्याचे मुरकुटे यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर ही चर्चा थंडावली असतानाच, काल बीआरएस खासदारांनी त्यांच्या घरी अचानक भेट दिल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सध्या सदाशिव लोखंडे शिर्डी लोकसभेचे शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार आहेत. पण आता राजकीय समिकरणे बदलू लागली आहेत. केंद्रीयमंत्री रामदास आठवले, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, बबन घोलप इच्छुक आहेत. स्पर्धकांची संख्या जास्त असल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.