नाशिक | प्रतिनिधी
गौरी गणपती व गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारातील बस मुंबई व ठाणे येथे पाठविण्यात आल्या आहेत. मात्र याचा फटका ग्रामीण व शहरी प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.
एकट्या लासलगाव आगाराकडून दिवसभरात ४२ बसद्वारे १२२ फेऱ्या होत असत. मात्र, बस कमी झाल्याने तब्बल ७३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, यात प्रामुख्याने नाशिक, नेवासा, अमळनेर, सुरगाणा व अन्य फेऱ्या रद्द केल्या आहेत. सध्या केवळ काही निवडक मार्गावरच गाड्या धावत आहेत. याबरोबरच पंचवटी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, येवला आदी आगारांच्याही बसेस मुंबई व ठाणे येथे पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून रोजंदारी कामगारांपर्यंत सर्वच प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बसेसची संख्या कमी झाल्याने बस आल्यानंतर प्रवासी झुंबड करत असल्याचे चित्र सर्वच बसस्थानकांवर दिसून येत आहे.
दरम्यान, २७ ऑगस्टला गणेश प्रतिष्ठापना असून, २८ ऑगस्टपर्यंत हीच टंचाई कायम राहणार असल्याची माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या प्रवाशांसह शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय यामुळे होत आहे. दररोज शाळेला यावे लागते.मात्र, बस बंद असल्याने सकाळी खूप उशीर होतो. खासगी वाहनाने जाणे परवडत नाही, तासनतास थांबावे लागते. गाड्या बंद केल्याने रोजंदारी कामगारांचे हाल होत आहेत.अशा तक्रारी नोकरदार, विध्यार्थी करत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




