दिल्ली | Delhi
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताची चौकशी सुरू असतानाच खळबळजनक घटना समोर आली आहे. अपघातावेळी ड्यूटीवर असलेला सिग्नल इंजिनीयर कुटुंबियांसह बेपत्ता असल्याचं तपासातून समोर आलं आहे. रेल्वे प्रशासनाने या अपघातासाठी सिग्नल यंत्रणेतील दोष कारणीभूत असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरू करण्यात आली. त्यानंतर आता सीबीआयने सिग्नल यंत्रणा विभागातील सिग्नल जुनियर इंजीनियरचं घर सील केलं आहे. परंतु तो कुटुंबियांसहित गेल्या काही दिवसांपासून फरार असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, १६ जूनला बालासोरला भेट दिल्यानंतर १९ जूनला सीबीआयची टीम पुन्हा एकदा बालासोरला गेली होती. त्यावेळी सोरो येथील अन्नपूर्णा राईस मिलजवळील सिग्नल जूनियर इंजीनियरचे भाड्याचे घर सील करण्यात आले आहे. त्याचे नाव आमिर खान असे असून आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयचे दोन कर्मचारीही त्याच्या घरावर लक्ष ठेवून आहेत. ट्रेनच्या सुरक्षित प्रवासाकरिता सिग्नल ज्युनिअर इंजीनियरची भूमिका खूप महत्वाची असते. सिग्नल, ट्रॅक सर्किट्स, पॉइंट मशीन्स आणि इंटरलॉकिंग सिस्टीमसह सिग्नलिंग उपकरणे इंस्टॉल करणे, तसेच त्यांची देखभाल आणि दुरुस्ती यामध्येही त्यांचा सहभाग असतो. सिग्नल ज्युनिअर इंजीनियरची भूमिकाही रेल्वेमधील विभाग किंवा झोननुसार काहीशी वेगळी असू शकते.
बालासोरमध्ये रेल्वेत नोकरी करणारा सिग्नल इंजिनीयर भाड्याच्या खोलीत राहत होता. रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी सुरू झाल्यापासून तो कुटुंबियासहित बालासोरमधून फरार झाला आहे. यापूर्वी सीबीआयच्या प्राथमिक तपासात त्याची चौकशी करण्यात आली होती. परंतु दुसऱ्यांदा सीबीआयचं पथक त्याच्या घरी पोहचल्यानंतर तो फरार झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घर सील करत सिग्नल अभियंत्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे अपघात झाल्यानंतर सहा जून रोजी अज्ञात आरोपींवर एफआयआर दाखल करण्यात आला होता. सिग्नल यंत्रणेशी छेडछाड झाल्याचा आरोप रेल्वेकडून करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची सीबीआयने चौकशी सुरू केली.
दरम्यान, ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातातील मृतांची संख्या आता २९२ वर पोहचली आहे. रविवारी (१९ जून) पश्चिम बंगालमधील २४ वर्षीय गंभीर जखमी प्रवाशाचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. अपघात घडला तेव्हा २८७ प्रवाशांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला होता. यानंतर पाच प्रवाशांचा गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय १२०८ प्रवासी जखमी झाले आहेत.