शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
संघटन पर्वाच्या माध्यमातून पक्षाची बांधणी मजबुत करतानाच येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत पक्षाला पुन्हा विजय प्राप्त करुन देण्याचा संकल्प या आधिवेशनात आम्ही करणार आहोत. मात्र महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी नेत्यांना साथ दिली, आता नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकद उभी करायची आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या शिर्डी येथील प्रदेश आधिवेशनाच्या पूर्व संध्येला ना. बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधून आधिवेशना मागची भूमिका स्पष्ट केली. यामध्ये प्रामुख्याने त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा उल्लेख करुन, या निवडणुकींना आम्ही महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचे सांगून या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळेच पक्षाची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आम्ही उभी करणार आहोत.
शिर्डी येथे होत असलेले आधिवेशन हे ऐतिहासिक आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत जनतेने फडणवीस सरकार निवडून दिले. 237 संख्याबळ असलेले हे सरकार निवडून दिल्याबद्दल जनतेचे आम्ही आभार मानणार आहोत. कार्यकर्त्यांनीही या विजयात मोठे योगदान दिले. त्यांचेही आभार व्यक्त केले पाहीजे. अशा कार्यकर्त्यांचा सन्मानही केला पाहीजे यासाठी हे अधिवेशन महत्वपूर्ण आहे. आधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही मार्गदर्शन होणार असून, मंत्री आशिष शेलार हे अभिनंदनाचा ठराव मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात महायुतीने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करणे हे आमचे उदिष्ठ असून सोबतीलाच पक्षाचे संघटनपर्व सुरु झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी संघटन मजबुत करुन दिड कोटी सदस्य संख्या आम्ही गाठणार आहोत. आमची निवडणुकीची तयारी असली तरी महायुती म्हणून निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत.
महाराष्ट्राचे राजकारण हे संस्कृती आणि संस्कार पाळून पुढे जाते. मनात कटूता ठेवून चालत नाही. त्यामुळेच उध्दव ठाकरे यांनी देवेंद्रजींवर टिका केली असली तरी नियतीने त्यांना दोन महिन्यातच भेटीसाठी पाठविले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधी पक्षातील नेतेही भेटी घेत आहेत. यातूनच राज्याच्या विकासाच्या दृष्टीने काही सूचना स्विकारत आहेत, असेही ना. बावनकुळे म्हणाले. याप्रसंगी प्रदेश कार्याध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण, महामंत्री विजय चौधरी, पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये, डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग उपस्थित होते.