नागपूर | Nagpur
काही वेळापूर्वीच महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्रिपदाचे घोडे कुठेही आडलेले नाही, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आमचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाबाबत जो काही निर्णय राहील त्याला एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा राहील, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा नेता म्हणून घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे भाजपकडून स्वागत करण्यात आलेले असून त्यांनी घेतलेली भुमिका चौदा कोटी जनतेसाठी महत्वाची असल्याचे सांगत त्यांचे अभिनंदन करतो, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे महायुतीवर नाराज आहेत, ते भाजपवर नाराज आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वावड्या विरोधकांनी उठवल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या अतिशय कणखर आणि कर्तबगार व्यक्ति बद्दल विरोधकांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न केले. मात्र आज एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे नेते म्हणून जो काही निर्णय घेतला तो अतिशय स्पष्ट असून त्यांनी आपली भूमिका महाराष्ट्राचा जनतेसमोर मांडली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या आजच्या भूमिकेनंतर विरोधी पक्ष नेत्यांच्या ज्या काही तोंडाच्या वाफा सुरू होत्या त्या वाफा या वाफाच राहिल्या आहेत.किंबहूना एकनाथ शिंदे आज अन् उद्याही आमचे नेते आहेत. त्यांची भूमिका ही महायुती भक्कम करणारी आहे. अशी प्रतिक्रिया देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.
शिंदे यांचे राज्याच्या विकासासाठी मोठे योगदान आहे. आम्ही आधीपासून त्यांचे काम पाहत आलो आहोत. फडणवीस मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी चांगले काम केले. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. आमचे तिन्ही नेते सांगायचे आमची लढाई मुख्यमंत्रिपदासाठी नाही. महाविकास आघाडीत तर ८ मुख्यमंत्री तयार झाले होते. महाविकास आघाडी ही मुख्यमंत्रिपदासाठी लढत होती. तर आम्ही जनतेच्या विकासासाठी लढत होतो. त्यामुळे जनतेने आम्हाला स्वीकारले, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
लाडकी बहीण, शेतकरी वीज माफी, पीक विमा योजना सारख्या योजना आमच्या सरकारने आणल्या. लोकसभेत, विधानसभेत तिन्ही पक्ष एकत्र येऊन काम केले, ऐतिहासिक बहुमत राज्यात मिळाले. आमचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल ते आमच्यासाठी अंतिम असते. आमच्या नेतृत्वाचे आदेश मान्य असल्याचे आज शिंदे यांनी सांगितले. त्यांनी कधीही नेतृत्वाच्या आदेशाला टाचणीभर मागे पुढे केले नाही. आमची लढाई मुख्यमंत्रिपदासाठी नाही. आम्ही जनतेसाठी लढलो म्हणून जनतेने आमचा जाहीरनामा स्वीकारला, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
मला काय मिळाले त्यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळाले, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. अडीच वर्षाच्या कार्यकाळावर मी समाधानी आहे, असे सांगून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडत भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा केला. आता मुख्यमंत्री कोण होणार? असे बावनकुळे यांना विचारले असता, मला अधिकार असते तर माझ्या मित्राचे नाव घेतले असते असे सांगून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा