चांदवड | प्रतिनिधी Chandwad
बहादुरी येथील ३५ वर्षीय कल्याणी संतोष शिरसाठ या महिलेने शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी वडनेरभैरव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान सुभाष दगु जाधव (वय ५३, रा. गोहरण, ता. चांदवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कल्याणी संतोष शिरसाठ वय ३५ रा बहादूरी ता चांदवड हिचा २०१४ रोजी संतोष दत्तात्रय शिरसाठ यांच्याशी विवाह झाला होता.
१९ मे २०१४ पासून ते १९ जुलै २०२५ पर्यंत कल्याणी हिला तिच्या पती व सासरच्या मंडळींनी वेळोवेळी विविध कारणांमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. या सातत्याने चाललेल्या त्रासामुळे अखेर कल्याणीने शनिवार दि १९ रोजी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान विहिरीत आत्महत्या केली,असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या आत्महत्येस जवाबदार म्हणून १) संतोष दत्तात्रय शिरसाठ (पती) २) दत्तात्रय दगु शिरसाठ (सासरे) ३) चंद्रकला दत्तात्रय शिरसाठ (सासू) सर्व रा.बहादुरी, ता. चांदवड यांची नावे फिर्यादीत टाकण्यात आली आहे. यावरून वडनेरभैरव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मयत महिलेच्या सासरच्या अंगणात आज रविवार दि २० रोजी दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार केला. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.कल्याणीच्या अंत्यविधीस पती,सासरा व सासू उपस्थित नव्हते.यावेळी कल्याणीचे दहा वर्षाचा मुलगा युग व तीन वर्षीय मुलगी अनुश्री उपस्थित होते. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए बी पवार करीत आहेत.या घटनेमुळे पंचक्रोशीतील गावात हळहळ व्यक्त होत आहे.




