धुळे – Dhule – प्रतिनिधी :
तालुक्यातील अजनाळे येथे आज सकाळी अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. घरात आणलेले भुईमुगाचे बियाणे शेंगदाणे समजून खाल्याने एक पाच वर्षीय बालकाचा विषबाधा झाल्याने मृत्यू झाला. तर चौघा बहिण व भावंडांवर जवाहर फाऊंडेशनच्या रुग्णालयात उपचार सुरू असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
धुळे तालुक्यातील अजनाळे येथील पवार हे आदिवासी कुटुंब शेतीत काम करतात. मालकाच्या शेतात भुईमुगाचे बियाणे पेरायचे होते. त्यासाठी आणलेले भुईमुगाचे बियाणे हे घरात पिशवीत ठेवले होते. त्यामुळे आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बियाण्याची पिशवी घरातील लहान मुलांच्या हाती लागली.
पाचही मुलांनी खाऊच्या उत्सुकतेपोटी पिशवी उघडली. बियाणे हे शेंगदाणे समजून खाल्ले. काही वेळाने सर्वांनाच उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरु झाला. घरातील लोकांनी मुलांना विचारले असता त्यांनी पिशवीतील शेंगदाणे खाल्याचे सांगितले. त्यामुळे संपूर्ण घर हादरले.
त्यांनी तातडीने सर्व मुलांना उपचारार्थ जवाहर फाऊंडेशनच्या रुग्णालयात आणले. मात्र शमशेर शेरसिंग पवार (वय 5) याचा रस्त्यातच मृत्यू झाला. मयत शमशेरसह त्याचे सख्खे भाऊ धनवीर शरसिंग पवार (वय 2), ननदीर शेरसिंग पवार (वय 7) यांचेसह चुलत बहिण नकाशा सोन्या पवार (वय 12) आणि शोर सोन्या पवार (वय 5) यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. चौघांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत उपचार करून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.