नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध सतत कठोर पावले उचलत आहे. ७ मे च्या रात्री भारताने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले करून तळं उद्ध्वस्त केली. त्यापूर्वी, भारत सरकारने भारतातील अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घातली होती. त्यानंतर त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मसह अन्य स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरही बंदी घालण्यात आली. असे असूनही पाकिस्तानकडून हल्ले सुरूच होते आणि चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता भारताने पाकिस्ताननंतर चीनविरोधातही कडक पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे.
चीनचे मुखपत्र असेलेल्या ग्लोबल टाईम्स वर राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण होईल, अशी चुकीची माहिती आणि कंटेंटचा प्रसार केल्या प्रकरणी भारताने चीनच्या सरकारी मीडिया ग्लोबल टाईम्सच्या एक्स अकाउंटचा ॲक्सेस ब्लॉक केला असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
ग्लोबल टाईम्स हे चीनची आक्रमकपणे भुमिका मांडण्यासाठी कुप्रसिध्द आहे. ते भारताविरुद्ध खोट्या बातम्या पसरवते. तसेच, चीनची वृत्तसंस्था झिनुआ न्यूजचे X अकाउंटही केले ब्लॉक करण्यात आले आहे. या कारवाया करण्यापूर्वी भारताने अरुणाचल प्रदेशवर चीनबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली होती.
Chinese state mouthpiece 'Global Times' account withheld in India
Read @ANI Story | https://t.co/iiTIVmT44M#India #GlobalTimes #China pic.twitter.com/LEkhZ8dSME
— ANI Digital (@ani_digital) May 14, 2025
चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या आश्रयाखाली काम करणारे ग्लोबल टाईम्स अनेकदा भारतावर टीका करणारे आणि बीजिंगच्या भू-राजकीय भूमिकेशी जुळणारे कथा प्रकाशित करते. त्याच्या सामग्रीवर चुकीची माहिती पसरवल्याबद्दल वारंवार टीका झाली आहे, विशेषतः २०२० च्या गलवान संघर्षासारख्या वाढत्या भारत-चीन तणाव निर्माण झाला असताना ग्लोबल टाईम्सने अत्यंत निराधार माहिती देत भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता.
अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांना त्यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. यावर भारताने आपली भुमिका मांडत म्हंटले की, अशा हास्यास्पद प्रयत्नांमुळे काहीही फरक पडणार नाही. अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा चीनने दावा केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यावर म्हणाले की, चीनने भारतातील अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याचे व्यर्थ आणि हास्यास्पद प्रयत्न केल्याचे आपण पाहिले आहे. आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार आम्ही अशा प्रयत्नांना स्पष्टपणे नकार देतो.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा