Thursday, February 5, 2026
Homeनगरसफाई कर्मचार्‍यांचा घंटागाड्या चालवण्यास नकार

सफाई कर्मचार्‍यांचा घंटागाड्या चालवण्यास नकार

ग्रामपंचायतींसमोर पेच || इलेक्ट्रॉनिक वाहनाच्या देखभाल दुरुस्तीचाही प्रश्न

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर जिल्हा परिषदेने साधारण दोन वर्षापूर्वी ग्रामीण भागात कचरा संकलन प्रश्नावर मात करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक घंटागाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यात 14 वा वित्त आयोग व नाविन्यपूर्ण योजनेतून 367 घंटा गाड्या खरेदी करण्यात आलेल्या आहेत. मात्र, ग्रामपंचायत पातळीवर या गाड्या चालवण्यास सफाई कर्मचारी संघटनेने नकार देत याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे असमर्थतता दर्शवली आहे. यामुळे ग्रामीण भागात कचरा संकलित करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या या घंटागाड्या चालवणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी अकोला तालुक्यासाठी 12, संगमनेर 30, राहुरी 32, श्रीरामपूर 8, नगर 38, कोपरगाव 8, राहाता 42, नेवासा 17, शेवगाव 28, पाथर्डी 32, जामखेड 24, कर्जत 30, श्रीगोंदा 32 आणि पारनेर 32 अशा 367 ई- घंटागाड्या खरेदी करून ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आलेल्या आहेत. या गाड्यांमार्फत संबंधित गावांत दैनंदिन कचरा संकलित करण्यात येत आहे. मात्र, बहुतांशी ठिकाणी मनुष्यबळ आणि अन्य कारणामुळे या इलेक्ट्रॉनिक कचरा संकलन घंटागाड्या बंद असल्याचे दिसत आहे. याला प्रमुख कारण म्हणजे ग्रामीण भागात ग्रामपंचायत पातळीवर आधीच मनुष्यबळाचा तुटवडा, तसेच मनुष्यबळ उपलब्ध असले तरी संबंधित मनुष्यबळाला पगार कसा द्यावा, असा प्रश्न ग्रामपंचायतीसमोर आहे.

YouTube video player

ग्रामपंचायतचे स्वतःचे उत्पन्न, विविध रूपाने संकलित होणारा कर याचा ताळमेळ पाहता प्रत्येक ग्रामपंचायतीला कचरा संकलनाच्या कामासाठी पर्यायी मनुष्यबळ आणि त्यावर होणारा खर्च परवडण्यासारखा नाही. त्यातच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे सध्या असणार्‍या सफाई कामगारांनी या इलेक्ट्रीक वाहनाद्वारे कचरा संकलन करण्यास स्पष्ट नकार दिला असल्याने बहुतांशी ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून उपलब्ध करून दिलेल्या कचरा संकलनाच्या गाड्या जागेवर उभ्या असल्याचे दिसत आहे. यामुळे आता जिल्हा परिषद आणि राज्य सरकारला या विषयात पर्यायी मार्ग काढण्याची वेळ आली आहे. अन्यथा साधनसामुग्री उपलब्ध असतानाही केवळ मनुष्यबळाअभावी हे काम ठप्प होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद पातळीवरून मॉनिटेरिंग व्हावे
जिल्ह्यात कचरा संकलनासाठी खरेदी करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक घंटागाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रश्न आहे. खरेदी करण्यात आलेल्या गाड्यादुरुस्तीचा संबंधित कंपनीसोबत करार असला तरी अनेक ठिकाणी या गाड्यांमध्ये वेगवेगळ्या तांत्रिक त्रुटी असल्याने बंद दिसत आहेत. यात गाड्या नादुरुस्त असणे, स्टेअरिंग प्रॉब्लेम, गाडीचा एक्सेल तुटलेला, हे वाहन तीन चाकी असल्याने ते पटकन पलटी होण्याची शक्यता. बॅटरी व चार्जर लवकर खराब होणे, वाहनाच्या इंजिनचे आयुष्य, वाहन वारंवार बंद पडणे यासह अन्य तांत्रिक अडचणींचा समावेश आहे. यामुळे कचरा संकलन वाहनाच्या स्थितीचे जिल्हा परिषद पातळीवरून मॉनिटेरिंग होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस शिपाई पदांसाठी उच्चशिक्षित मैदानात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गाच्या 73 रिक्त पदांसाठी होणार्‍या भरती प्रक्रियेस 11 फेब्रुवारी पासून सुरूवात होत असून 14 फेब्रुवारीपर्यंत मैदानी...