नवी दिल्ली वृतसंस्था | New Delhi
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील एका दुर्गम गावात झालेल्या ढगफुटीच्या घटनेत आत्तापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेत ७९ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या बचावकार्य सुरु असून लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, जम्मू काश्मीरच्या चशोती भागात ढगफुटी झाली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले, की प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केले असून बचाव पथके घटनास्थळाकडे रवाना झाली आहेत. या घटनेनंतर नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी किश्तवाडचे डीसी पंकज कुमार शर्मा यांच्याशी, तसेच त्यांनी स्थानिक आमदार आणि जम्मू-काश्मीरच्या विधानसभेचे विरोधीपक्षनेते सुनील कुमार शर्मा यांच्याशी देखील याबद्दल चर्चा केल्याचे सांगितले होते.
पुढील ४ ते ६ तासांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती
श्रीनगरच्या हवामान विभागाने पुढील ४ ते ६ तासांत जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती दिली आहे. मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह, सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा श्रीनगर हवामान केंद्राने दिला आहे. पूरपरिस्थितीमुळे लंगरची शेड वाहून गेल्याने किमान १२ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
किश्तवाडचे उपयुक्त पंकज शर्मा म्हणाले किश्तवाडच्या भागात अचानक पूर आला. या भागातून माचैल माता यात्रेची सुरुवात होते. दरम्यान या भागातही बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे . जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींना लवकर बरे होण्यासाठी ही प्रार्थना केली आहे. तसेच नागरी पोलीस ,सैन्य, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्यासाठी पूर बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ते स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. “किश्तवाड जिल्ह्यातील ढगफुटीबाबत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी बोललो. स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे. एनडीआरएफ पथके तातडीने घटनास्थळी रवाना झाली आहेत. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि प्रत्येक परिस्थितीत जम्मू-काश्मीरच्या जनतेसोबत ठामपणे उभे आहोत,” अशी माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांनीही सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. ‘जम्मू-काश्मीरच्या किश्तवारमधील ढगफुटी आणि पुरग्रस्तांबरोबर माझ्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. गरजूंना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टमार्फत म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




