नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
उत्तराखंडमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे यमुनोत्री धामसह अनेक भागांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते तुटले आहेत, नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तराखंडमध्ये गेलेले देशभरातली ६०० भाविक यमुनोत्री धाम अडकले आहेत. उत्तराखंडमध्ये फिरायला गेलेले महाराष्ट्रातील २०० पर्यटक अडकल्याची माहिती मिळाली आहे. या पर्यटकांमध्ये ५० जण मुंबईतील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. यमुनोत्री धाममध्ये हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हिमाचल, उत्तराखंड या राज्यांमधील अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गाड्या वाहून गेल्या, काही घरांमध्ये पाणी शिरले, तर काही ठिकाणी पत्त्याच्या बंगल्यासारखी घरे जमीनदोस्त झाली. पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. या पावसामुळे महापूर आला आहे.
महाराष्ट्रातील पर्यटक अडकले
यमुनोत्री इथे सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने अक्षरश: कहर केला आहे. त्यामुळे या मुसळधार पावसात अनेक यात्रेकडू अडकले आहेत. यमुनोत्री धाममध्ये महाराष्ट्रातील २०० प्रवाशी अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये मुंबईमधील ५० प्रवाशांचा समावेश आहे. पर्यटकांचे व्हिडिओ समोर आले आहेत. महाराष्ट्र सरकारकडे मदतीची मागणी करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे यमुनोत्रीला रेड अलर्ट जारी केला आहे.
अडकलेल्या पर्यटकांना रेस्क्यू करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तराखंडमुळे अतिवृष्टीमुळे परिस्थिती खूप बिकट असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रातील २०० पर्यटकांमध्ये मुंबईतील ५० असल्याचे सांगितले जात आहे, उर्वरित पर्यटक कुठले आहेत याची सध्या माहिती मिळू शकली नाही.
यमुनोत्रीला रेड अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. आजही यमुनोत्री धामला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तरकाशीतील सिलाई बँड परिसरात ढगफुटीमुळे यमुनोत्री महामार्ग तुटला. त्यामुळे ६०० हून अधिक यात्रेकरू यमुनोत्री धाममध्ये अडकले आहेत. रस्ते बंद झाल्याने प्रशासनाने यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. यमुना आणि गंगा नद्यांचे जलस्तर वाढल्याने पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. देहरादून, नैनीताल, हरिद्वार, टिहरी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, चंपावत आणि उधमसिंग नगरसह अनेक जिल्ह्यांत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




