श्रीनगर | Shrinagar
देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका जम्मू-काश्मीरला बसला आहे. विशेषतः दोडा जिल्ह्यात ढगफुटी झाल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. या ढगफुटीमुळे १० हून अधिक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे या परिसरात भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत, ज्यामुळे अनेक प्रमुख रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गाचे काही भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. महामार्गावरील खड्ड पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवली गेली आहे. तसेच, पर्यायी रस्ताही बंद असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. हवामानाची स्थिती सुधारल्यानंतरच वाहतूक पूर्ववत केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
कठुआ जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने सतर्कता दाखवत सखल भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या पुरामुळे आयुष विभागाची एक इमारत कोसळली आहे. तसेच, डोंगराळ भागात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे. पुरमंडलमधील देविका नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने परिसरातील धोका वाढला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ७२ तास जम्मू-काश्मीरसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या काळात ढगफुटी आणि भूस्खलनाचा धोका कायम राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. तसेच, सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना तत्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासन लोकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.





