मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोगच्या ग्रामस्थांनी २५ फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला सातवा आरोपी कृष्णा आंधळे याला तत्काळ अटक करावी, या हत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, यासह आदी प्रमुख मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मागील आठवड्यात देण्यात आला होता.
त्यानुसार, राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक मागणी मान्य केली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे (Balasaheb Kolhe) यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीच्या आदेशाची प्रत सोशल मीडियावर शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्यादृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाबत मानली जात आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी (Villagers) सरकारी वकील (Public Prosecuto) म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी लावून धरली होती. त्यानंतर अखेर या मागणीला यश आले आहे.
दरम्यान, उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याने संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “निकम यांच्या नियुक्तीमुळे एसआयटी, सीआयडीच्या अधिकाऱ्यांना वकिलांची मदत होईल. कुठे काही उणिवा वाटत असतील तर मदत होईल. जी चौकशी सुरू आहे, त्यात जास्तीचा फायदा होऊ शकतो. लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, यासाठीही सरकारी वकिलांचा उपयोग होईल”, असे त्यांनी म्हटले.