सातारा | Satara
आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यातील फलटण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ऑक्टोबरच्या हप्त्याचे १५०० रुपये कधी मिळणार याकडे राज्यातील पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीच बंद करणार नाही, असे म्हटले आहे. ते फलटण येथील कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर तरूणी आत्महत्याप्रकरणाबाबतही भाष्य केले. ‘भगिनीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही’, असे म्हणाले. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबतही माहिती दिली. लाडकी बहीण योजना अविरत सुरू राहणार, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आम्ही सुरु केलेली योजना बंद होऊ देणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपले जे महायुतीचे सरकार आहे ते विकासाचा विचार करणारे सरकार आहे.आम्हाला समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास हवाय. या महाराष्ट्रातील दुष्काळी भाग आहे त्यातला दुष्काळ आम्हाला दूर करायचा आहे. आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्हाला मदत करायची आहे. आपण बघा महाराष्ट्रतल्या शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांकरता दिले आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाणे देखील सुरु झाले आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही सुरु केलेल्या योजना कधीच बंद होऊ देणार नाही. सातत्याने काही लोकं सांगतात,लाडकी बहीण योजना बंद होणार, मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत देवाभाऊ आहे, शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, तोपर्यंत लाडकी बहीण योजना आम्ही कधीच बंद होऊ देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीज सातत्याने मिळत राहिल
‘लाडकी बहीण महिलांसाठी आहे. लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीज सातत्याने मिळत राहिल. हा विश्वास यावेळी मी देतो’, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी सभेत शेतकरी आणि विविध योजनांबाबतही भाष्य केले. विजेचं बिल जे माफ केलेलं आहे, पाच वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही, हे पुन्हा एकदा सांगतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पाच वर्षांनी तुम्ही आमचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला तर अजून पाच वर्षापर्यंत तुम्हाला सवलत देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आतातरी पाच वर्षापर्यंत वीज सवलत ठेवलेली आहे. सौरऊर्जाकरण करतोय, त्यानंतर 2026 च्या डिसेंबरमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस, दिवसा 12 तास वीज आणि मोफत वीज दिल्याशिवाय राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




