मुंबई | Mumbai
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेतील शंका, मतदार यादीतील त्रुटी व निवडणुकीच्या पारदर्शकतेसंबंधी मुद्दे उपस्थित करत निवडणूक आयोगाची (Election Commission) भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील हजर होते. या भेटीनंतर सर्व नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. त्यानंतर आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले की, “माझ्या आयुष्यात इतके कन्फ्यूज विरोधक मी कधी पाहिले नाहीत. इतके मोठे-मोठे लोक त्यांना कोणाकडे गेले पाहिजे, काय केलं पाहिजे? कायदा (Law) काय आहे? हे देखील माहिती आहे की नाही हे मला माहीत नाही. पण मला वाटतं त्यांना सर्व माहिती आहे, पण केवळ आपण निवडणूक हारलो तर? यासाठी ते आधीच कारणं शोधून ठेवत आहेत”, असा खोचक टोला यावेळी फडणवीस यांनी विरोधकांना (Opponents) लगावला.
पुढे ते म्हणाले,”विरोधक काल राज्यात जे निवडणूक अधिकारी आहेत, त्यांच्याकडे गेले होते. पण ते ज्या अधिकाऱ्यांकडे गेले होते, त्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं काहीच नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेचा वेगळा कायदा आहे. त्यातून स्टॅट्यूटरी इलेक्शन कमिशन तयार झालेले आहे. ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहे. या इलेक्शन कमिशनबाबतचे सर्व अधिकार कायद्याने त्यांना आहेत, राज्य सरकारला देखील नाहीत. पण हे सर्व विरोधक काल जाऊन त्यांना भेटले, त्यांना भेटल्यानंतर यांच्या लक्षात आलं, आपल्याला भेटायचं होतं दिनेश वाघमारेंना मग काल त्यांच्याशी चर्चा करून काही तरी थारूर मातूर सांगितलं”, असं फडणवीस यांनी म्हटले.
तसेच “आज पुन्हा विरोधक निवडणूक अधिकाऱ्यांना भेटले, तिथे काय मागणी करावी हे त्यांना समजले नाही. मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी, जे काही राज्याचे निवडणूक आयोग आहे ते पूर्ण निवडणुका करत असतं. सगळे अधिकार त्यांना आहेत, निवडणूक यादी संदर्भात ते पहिल्यांदा विधानसभा, लोकसभेची जी मतदार यादी आहे, ती आधी जारी करतात, मग त्यानंतर सर्वांना त्यावर हरकतीसाठी संधी दिली जाते. या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजे, मात्र असं काहीही न करता, कायदा समजून न घेता केवळ एक नरेटिव्ह सेट करायचा हा सगळा प्रकार आहे”, असंही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.




