पारनेर |प्रतिनिधी| Parner
दिलेला शब्द पाळत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यातील संवेदनशीलतेचा परिचय दिला. त्यांनी रविवारी कोपर्डी घटनेतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजेरी लावली. नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या टाकळी हाजी या गावात रविवारी दुपारी हा साधा विवाह सोहळा झाला. कोपर्डी (ता. कर्जत) येथील सुद्रिक कुटुंबातील मुलीचा विवाह निघोज (ता. पारनेर) येथील वराळ कुटुंबातील मुलाशी झाला. सोयीचे ठिकाण म्हणून लग्न शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे पार पडले. सुद्रिक यांनी आपल्या धाकट्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण फडणवीस यांना पूर्वीच दिले होते. त्यांनी यायचे कबुल केले होते.
मधल्या काळात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि कारभारही सुरू केला. मात्र, लग्नाला येतो, असा शब्द त्यांनी दिला होता. तो त्यांनी पाळला आणि लग्न समारंभाला फौजफाट्याह हजेरी लावत सर्वांना सुखद धक्का दिला. आठ वर्षांपूर्वी कोपर्डीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरण घडले होते. या घटनेवरून आंदोलनाची ठिणगी पडत मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाला होता. त्यानंतरच्या काळातील मराठा क्रांती मोर्चे आणि आंदोलनांनी राज्य ढवळून निघाले होते. फडणवीस कोपर्डीतील पीडितेच्या वडिलांशी संपर्क राखून होते. भय्यूजी महाराज यांच्यामुळे हा संपर्क अधिक घट्ट झाला होता. सुद्रिक यांनी आपल्या धाकट्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण फडणवीस यांना दिले होते. त्यांनी यायचे कबुल केले होते. दिलेला शब्द मुख्यमंत्री झाल्यावरही फडणवीस यांनी पाळला. यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे, प्रवीण दरेकर आदी उपसिञथत होते.
कुटुंबाला शुभेच्छा
आपल्याला या विवाहाचे निमंत्रण होते, त्यामुळे येथे येऊन वधू-वरांना शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही कुटुंबाला आमच्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.