मुंबई | Mumbai
राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे म्हटले जाते. याचा प्रत्यय महाराष्ट्रातील जनतेला गेल्या ६ वर्षांपासून सातत्याने येत आहे. एकेकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रु असलेल्या पक्षांनी एकत्र येत युती आणि आघाडी केल्याचे महाराष्ट्रातील राजकारणात पहायला मिळाले आहे. त्यामुळे राजकारणात काहीही शक्य आहे असे बोलले जाते. आताही असाच काही प्रत्यय राजकारणात येत असून सध्याच्या राज्याच्या राजकारणातही असाच काहीसा प्रवाह पाहायला मिळत आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय विरोधकांपैकी एक असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक केले.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल अनेक गोष्टी आवडतात असे सांगितले. याचबरोबर, शरद पवार जय-पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत राहतात, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
या वयातली ते जिंकले हरले तरी काम करत राहतात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात म्हटले आहे की, “शरद पवारांबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात. पण काही गोष्टी अशाही आहेत, ज्या मी स्वीकारत नाही. पण मी त्यांच्या सातत्याचे कौतुक करतो. या वयातही ते जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी काम करत राहतात, असे वक्त्यव्य त्यांनी केले आहे.
पवार-शिंदे संवादात चांगले नाही
तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी संवादात कोण चांगले आहे? याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत, असे म्हणत त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कमी दाखवली आहे. अर्थात हे दोघे या मताबाबत आपल्याला माफ करतील, असे देखील वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महाराष्ट्रात व्होट जिहादचा प्रकार घडला होता
दरम्यान, या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी लव्ह जिहाद, व्होट जिहाद यासारख्या गोष्टींवरही भाष्य केले. ते म्हणाले, “तरुण मोठ्या संख्येने आयसिसमध्ये का सहभागी होत आहेत? अल्पसंख्याकांचे कट्टरतावाद हे एक वास्तव आहे. तुम्ही वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जरी या शब्दावर अनेकदा चर्चा होत असली तरी, काही जिल्ह्यांमध्ये प्रेमसंबंधांच्या नावाखाली शोषणाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. जेव्हा लव्ह जिहादबद्दल गोष्टी बोलल्या जातात तेव्हा तुम्हाला कधीकधी ते अतिशयोक्ती वाटते. परंतु काही जिल्ह्यांमध्ये ही सत्य परिस्थिती आहे लव्ह जिहादप्रमाणेच, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात व्होट जिहादचा एक प्रकार घडला होता.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा