पुणे | Pune
वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी सासू, नणंद, पती शशांक यांना आधीच अटक केली आहे. तर फरार असलला सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांना आज पहाटे अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणी कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. CM फडणवीस म्हणाले, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे दोघांना आज सकाळीच अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य कारवाई केली आहे. पुढे हे प्रकरण तडीस घेऊन जाण्यापर्यंत जे काही करता येईल त्या गोष्टी पोलिस करतील, असेही फडणवीस म्हणाले.
पुढे ते असे ही म्हणाले, छळ करून आत्महत्या करायला लावणे या गोष्टी सहन केल्या जाणार नाही. या प्रकरणी जे करता येईल ते करू. मकोका लावण्यासाठी काही नियम आहेत. नियमात बसले तर मकोका लावू शकतो. पण मकोका लागेल की नाही हे आज सांगता येत नाही. त्यावर बोलू शकत नाही. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे वैष्णवी प्रकरणातील आरोपींवर मकोका लागेल की नाही अद्याप सांगता येत नाही.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, फार वाईट गोष्ट आहे. आज २१व्या शतकात जेव्हा मुली आणि सूनांमध्ये कोणताही फरक करणे चुकीचे आहे. अशा प्रकारची वागणूक देणे हे अतिशय पाप आहे. ते या ठिकाणी झाले आहे… सध्या याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी अजित पवार गंभीर नाहीत असे नाही. त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की, कोणी जर बोलवले तर आपण जातो, पण पुढे काय घडणार याची कल्पना नसते एवढा सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. पोलिसांनी उचित कारवाई केली आहे. पुढेही उचित कारवाई करतील. आता या प्रकरणाला खूप फाटे फोडता कामा नये. असे देखील फडणवीस म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा