Sunday, June 1, 2025
HomeनगरAhilyanagar : सरकार वंचितांच्या कल्याणासाठी अहिल्यादेवींप्रमाणे प्रजाहितदक्ष

Ahilyanagar : सरकार वंचितांच्या कल्याणासाठी अहिल्यादेवींप्रमाणे प्रजाहितदक्ष

श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व विचार आजही राज्यव्यवस्थेला मार्गदर्शक आहेत. अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायदानाची आदर्श व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रजाहितदक्ष, राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेऊन राज्य शासन देखील वंचितांच्या कल्याणासाठी काम करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींनी 28 वर्षं राज्यकारभार केला. त्यांनी केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात क्रांती घडवली. मंदिरांचे पुनरुज्जीवन, घाटांचे बांधकाम, धर्मशाळांची उभारणी, गरीब जनतेसाठी पाणीपुरवठ्याची यंत्रणा आणि महिला सक्षमीकरणाचे कार्य त्यांनी अत्यंत समर्पित वृत्तीने केले.

अहिल्यादेवी होळकर यांनी काशी, अयोध्या, मथुरा, पंढरपूर, नाशिक, जेजुरीसह देशभरातील धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार त्यांच्या स्वतःच्या निधीतून केला. त्यांनी सोमनाथ येथील मंदिर नव्याने बांधले. घाट, मंदिरे बांधताना, दानपुण्य करतांना सरकारी तिजोरीतून खर्च न करता स्वतःच्या संपत्तीतून खर्च केला. एवढी श्रीमंती असतानाही त्या योग्याप्रमाणे साधेपणाने जीवन जगल्या. त्यांनी स्वतःसाठी धन खर्च केले नाही, तर समाजाच्या कल्याणासाठी खर्च केले, म्हणून त्या लोकमाता ठरल्या. गोरगरिबांना रोजगार मिळवून देण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी माहेश्वर येथे त्यांनी एक मोठे वस्त्रउद्योग केंद्र उभारले, तेथे माहेश्वरी वस्त्र तयार होऊ लागले. त्यांनी एक समृद्ध अर्थव्यवस्था उभी केली.

महिला सैनिकांची स्वतंत्र तुकडी निर्माण करणार्‍या त्या पहिल्या महिला शासक होत्या. त्यांच्या सैन्यदलात शिस्त होती, कौशल्य होतं, आणि युद्धसज्जतेसाठी त्यांनी स्वदेशी तोफांचं उत्पादनही सुरू केलं. न्यायपद्धतीमध्ये त्यांचा दृष्टिकोन अत्यंत प्रगतीशील होता. अहिल्यादेवींची आदर्श न्यायदानाची व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रसतांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. सर्वसामान्यासारखे न्यायदान करतांना हुंडाबंदी केली. महिलांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य त्यांनी केले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आज देशभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जात आहे. जिल्ह्यातील एक लाख एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी जिल्ह्यात प्रकल्प राबविण्यात येणार आहे. श्रीक्षेत्र चौंडी विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला आमदार गोपीचंद पडळकर, मोनिकाताई राजळे, शिवाजीराव कर्डीले, सुरेश धस, विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते, अमोल खताळ, माजी मंत्री अण्णा डांगे, बबनराव पाचपुते, स्नेहलता कोल्हे, रमेश शेंडगे, प्रा. लक्ष्मण हाके, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.

प्रजाहिताचे धोरण राबविण्यावर भर- उपमुख्यमंत्री शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान चौंडी मराठी संस्कृतीचे जागृत देवस्थान आहे. लोककल्याणकारी राज्य, सुराज्य जगाला दाखविण्याचे काम अहिल्यादेवींनी केले. अहिल्यादेवींनी सर्वसामान्य माणसांच्या विकासाचे काम केले. त्यांनी धर्मरक्षणासाठी आयुष्य समर्पित केले. महिलांसाठी सैनिक तुकडी सुरू करण्याची त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांनी महिलांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शिकवण दिली आहे. आज आपण लेक लाडकी म्हणतो तसे सूनही लाडकी मानली पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद केली जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रपती व पंतप्रधानांना पुढच्या वर्षी चौंडी येथे नक्की आणणार
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढच्या वर्षी चौंडी येथे नक्की आणण्याचा शब्द मी देतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. अहिल्यादेवी यांनी स्वतःची शस्त्रास्त्रे बनवली होती. महिला सैनिकांची तुकडीही त्यांची होती. तोच आदर्श भारत सरकारचा पण आहे. मोदी सरकारने स्वतः बनवलेले ब्रह्मोस्त्र क्षेपणास्त्र याने नुकत्याच झालेल्या सिंदूर ऑपरेशनमध्ये पाकिस्तानची लष्करी तळे उद्ध्वस्त केली हे आपण पाहिले. हुंडा देणे व घेणे हा गुन्हा अहिल्यादेवींनी ठरवला होता व त्यांच्या 28 वर्षाच्या राज्य कारभारात असा गुन्हा करण्याची कोणाची हिंमत नव्हती, असे फडणवीस म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नगरमध्ये करोनाचे दोन नवे रुग्ण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. नगर जिल्ह्यातही करोनाचे दोन नवे रुग्ण सापडले असून यातील एकावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू...