Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी सरकार सक्रिय; शहरातील रस्ते धुण्यासाठी एक हजार टँकर

मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी सरकार सक्रिय; शहरातील रस्ते धुण्यासाठी एक हजार टँकर

मुंबई |प्रतिनिधी

ऐन दिवाळी सणात मुंबईतील प्रदूषणाची समस्या गंभीर बनल्याने प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार सक्रिय झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी यांसंदर्भांत बैठक घेऊन मुंबई परिसरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात. त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदुषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोहीम स्वरुपात काम करावे, असे निर्देश शिंदे यांनी आज दिले.

- Advertisement -

मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्याकरीता एक हजार टॅंकर लावावेत. त्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे. एमएमआरडीएची बांधकाम स्थळे धूळमुक्त आणि स्वच्छ करावीत. ॲण्टी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा, अशा सूचना शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्ता आय. एस. चहल यांना केली.

अलीकडच्या काही दिवसात मुंबई आणि परिसरात प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत प्रदूषणाची समस्या आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याच्या सूचना शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मुंबईसह महानगरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका तसेच राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी एकत्रितपणे कार्यवाही करावी. नागरिकांना प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले.

धुळीचे साम्राज्य पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी

मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यामुळे धुळीचे साम्राज्य पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावीत. त्याचबरोबर साचलेली धूळ साफ करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. रस्ते धुण्यासाठी टॅंकरची संख्या एक हजार पर्यंत वाढवावी, असेही त्यांनी सांगितले. मुंबईसह महानगर परिसरात एमएमआरडीएमार्फत विकास कामे सुरू आहेत.

अशा बांधकाम ठिकाणांवर धूळ रोखण्यासाठी पत्रे लावतानाच ही सर्व ठिकाणे धुळमुक्त करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. कामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पत्र्यांमुळे रस्त्यावरून जाताना नागरिकांना त्रास होणार नाही याचीही दक्षता घ्यावी, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या.

माती, डेब्रीज वाहून नेताना ती झाकून न्यावी

राज्यातील सर्व महापालिका, शहरांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आणि मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतानाच शहरातील सर्वाधिक प्रदूषण होणाऱ्या ठिकाणांवर संनियंत्रण करावे. वाहनांमधून रस्त्यांवरील माती, डेब्रीज वाहून नेताना ती झाकून वाहतूक करावी. तसे न करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई करावी, असे शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील महानगरांमध्ये नागरी वन क्षेत्र (मियावाकी) वाढविण्यासाठी महानगरपालिकांनी पुढाकार घ्यावा. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्प्रिंकलर्सचा वापर करा. हवेतील प्रदूषणावर उपाययोजना करताना संनियंत्रण करणे आवश्यक आहे. मुंबईमधील धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाऊड सीडिंगचा प्रयोग करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा दर आठवड्याला आढावा सादर करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी केल्या. यावेळी आयआयटीच्या तज्ञांनी प्रदूषण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी या तज्ञांनी केले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या