नाशिक। प्रतिनिधी Nashik
नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता अहवालास रु. 1498.61 कोटी इतक्या किंमतीस मान्यता प्रदान करण्यात आली असून याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे मांजरपाडासह (देवसाने) ( Manjarpada Project ) वळण योजनांच्या कामांना मिळणार गती मिळणार असून चतुर्थ प्रशासकीय मान्यतेनुसार 580.88 कोटी रुपयांची पुणेगाव दरसवाडीसह ओझरखेड पालखेड कालव्यांची अपूर्ण कामे पूर्ण होणार असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
छगन भुजबळ यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यानंतर गेल्या महिन्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत उर्ध्व गोदावरी प्रकल्पास चतुर्थ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर शासनाकडून चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता अहवालास रु. 1498.61 कोटी इतक्या किंमतीस मान्यता प्रदान करण्यात आली असून याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
यावेळी बोलतांना ना. भुजबळ यांनी सांगितले कि, उर्ध्व गोदावरी प्रकल्प, जि.नाशिक हा प्रकल्प गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सर्वसाधारण व आदिवासी क्षेत्रातील असून गोदावरी नदीच्या उपनद्यांवर आहे. या प्रकल्पाच्या पाणी वापरानुसार नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील 74,210 हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ होणार आहे.
बांधकामाची सद्य:स्थिती, किंमत वाढीची कारणमिमांसा, राज्य तांत्रिक सल्लागार समितीचा अहवाल तसेच प्रकल्पातील कामाच्या अनुषंगाने व त्याची कार्यवाही याचा परामर्श घेऊन नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद या जिल्ह्यांना वरदान ठरणा-या उर्ध्व गोदावरी प्रकल्पाचे काम पुर्णत्वास नेण्याच्या उद्देशाने सन 2018-19 च्या दरसूचीवर आधारीत रुपये 1498.61 कोटी इतक्या किंमतीच्या चतुर्थ सुधारीत प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
शासन निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील 11 प्रवाही वळण योजनांसाठी 206.51 कोटी, देवसाणे मांजरपाडा प्रकल्पासाठी 464.40 कोटी, वाघाड प्रकल्पासाठी 5.7 कोटी, करंजवण प्रकल्पासाठी 7.76 कोटी, ओझरखेड प्रकल्पासाठी 8.13 कोटी, पालखेड प्रकल्पासाठी 3.61 कोटी, तिसगाव प्रकल्पासाठी 50.07 कोटी, पुणेगाव प्रकल्पासाठी 12.5 कोटी असे एकूण 760.61 कोटींच्या निधीस मान्यता देण्यात आलेली आहे.
यासोबतच कालवा व वितरिकांच्या दुरुस्तीसाठी एकूण 633.45 कोटी रुपये निधीस मान्यता देण्यात आलेली असून वाघाडसाठी 11.97 कोटी, करंजवणसाठी 4.98 कोटी , ओझारखेडसाठी 73.18 कोटी , पालखेडसाठी 67.90 कोटी , तिसगावसाठी 66 लक्ष, पुणेगावसाठी 294.96 कोटी तर दरवसवाडीसाठी 179.79 कोटी रुपये निधिस मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. उर्ध्व गोदावरी प्रकल्पास मिळालेल्या चतुर्थ प्रशासकीय मान्यतेने जिल्ह्यातील जलसंधारणाचे प्रकल्प मार्गी लागणार असून येवल्यातील मांजरपाडासह जिल्ह्यातील 11 प्रवाही वळण योजनांच्या कामांना गती मिळणार आहे.