सोलापूर | Solapur
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसला त्यांच्याच बालेकिल्ल्यात पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय. या निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली मरगळ झटकण्यासाठी आणि त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी एक भावनिक पत्र लिहिले आहे.
प्रणिती शिंदे यांनी पत्राची सुरुवात अशी केली असून त्यात त्या म्हणतात, “महानगरपालिका निवडणुकीचे निकाल आपल्या अपेक्षांप्रमाणे लागले नाहीत, हे सत्य आपल्याला स्वीकारावे लागेल. कार्यकर्त्यांनी अनेक महिने रस्त्यावर उतरून संघर्ष केला, घरोघरी जाऊन पक्षाचा विचार पोहोचवला. मात्र, ही मेहनत आज आकड्यांमध्ये रूपांतरित होऊ शकली नाही, याची खंत आहे.” त्यांनी या पराभवाचे खापर सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर फोडताना म्हटले की, आपण बलाढ्य धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग, यंत्रणांचा गैरवापर आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या अत्यंत कठीण परिस्थितीत ही निवडणूक लढलो आहोत.
पुढे त्या पत्रात लिहितात की, “राजकारणात जय-पराजय येत-जात असतात. मात्र, तुमची निष्ठा आणि प्रामाणिकपणा हीच आपली खरी शिदोरी आहे. तुम्ही ज्या जिद्दीने काम केले, ते कुठेही वाया गेलेले नाही.”
त्यांनी लिहिले, “झुकना हमारी फितरत नहीं, दो कदम पीछे हटे हैं पर सिर्फ अगली छलांग लगाने के लिए!” म्हणजेच आपण मागे हटलो आहोत ते केवळ भविष्यातील मोठ्या झेपेसाठी, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पराभवावर चिंतन करण्याची गरज व्यक्त करताना प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, ही वेळ खचून जाण्याची नाही तर आत्मपरीक्षणाची आहे. लोकांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, बदलणारे सामाजिक वास्तव काय आहे आणि धनशक्तीचा सामना कसा करायचा, यावर आपल्याला आता गांभीर्याने विचार करावा लागेल. “आज आपण थोडं थांबू, श्वास घेऊ आणि उद्याच्या लढाईसाठी अधिक सज्ज होऊ,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.




