नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% कर लादल्यानंतर, भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत’ म्हटले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही ट्रम्प यांच्या वादग्रस्त विधानावरुन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ही बाब संपूर्ण जगाला माहिती असून फक्त भारत सरकार ते स्वीकराण्यास तयार नसल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत.
राहुल गांधी काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना लोकसभेतील विरोधीपक्ष नते राहुल गांधी म्हणाले की, “हो, ते बरोबर आहेत. पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना सोडून सर्वांना हे माहिती आहे. सर्वांना माहिती आहे की भारतीय अर्थव्यव्यवस्था ही मृत अर्थव्यवस्था आहे. मला आनंद आहे की अध्यक्ष ट्रम्प यांनी एक सत्य सांगितले आहे. संपूर्ण जगाला माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था मृत अर्थव्यवस्था आहे. भाजपाने अदाणी यांची मदत करण्यासाठी अर्थव्यवस्था संपवली आहे.” मात्र भारत सरकार ह स्विकारणार नाही, अशी बोचरी टीका राहुल गांधींनी केली आहे.
भारतातील तरुणांचे भविष्यही उद्ध्वस्त केले
याशिवाय, राहुल गांधींनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींवर भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. त्यांनी लिहिले, “भारतीय अर्थव्यवस्था मृतावस्थेत आहे. पंतप्रधान मोदींनी अदानी-मोदी भागीदारी, नोटाबंदी आणि दोषपूर्ण जीएसटीने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. ‘असेंब्ली इन इंडिया’ अयशस्वी झाली, एमएसएमई नष्ट केले, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले, त्यांनी भारतातील तरुणांचे भविष्यही उद्ध्वस्त केले आहे.”
सरकारच्या आर्थिक धोरणांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली आहे. यानंतर सरकारवर विरोधकांकडून कडाडून टीका केली जात आहे. यादरम्यान राहुल गांधी यांनी हे विधान केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातीवर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केल्यानंतर राहुल गांधी यांचे हे विधान आले आहे. रशियासोबतच्या भारताच्या व्यापार संबंधांवर टीका करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी म्हटले की, भारत रशियाशी काय व्यवहार करतो, याची मला पर्वा नाही. मात्र, दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था मृतावस्थेत आहेत, अशी टीका ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




