मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्य विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदानाचा मुद्दा काँग्रेसने पुन्हा हातात घेतला असून या मुद्द्यावर जनजगृती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उद्या, गुरुवारी राज्यभर मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः गडचिरोलीमधील आंदोलनात सहभागी होणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड मोठे यश मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत युती १०० जागाही जिंकू शकणार नाही, अशी परिस्थिती असताना भाजप युतीला प्रचंड बहुमत मिळाले. विधानसभा निवडणुकीचा हा निकाल अनाकलनीय आणि अविश्वसनीय आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर संशय निर्माण झाला आहे. निवडणूक पार पडल्यानंतर सरासरी ५८ टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले असताना दुसऱ्या दिवशी मात्र ६६.५ टक्के मतदान दाखवून त्यात तब्बल ७.८३ टक्क्यांची वाढ दाखवली. हा एक मोठा घोटाळा असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला आहे.
निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. पण त्यांच्यावर संशयाचे ढग जमा होत असतील तर ते लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाही व्यवस्था अबाधित रहावी आणि निवडणूक आयोगावर निर्माण झालेले संशयाचे ढग दूर व्हावेत म्हणून विधानसभा निवडणुकीतील ‘मॅच फिक्सिंग’ ची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. आजच्या आंदोलनात पक्षाचे वरिष्ठ नेते, आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती पक्षाने दिली आहे.