ओझे | वार्ताहर
नाशिक जिल्ह्यासह दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे नदी नाल्याना पूर आला आहे. यामुळे दिंडोरी तालुक्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिशय महत्वाच्या मांजरपाडा (देवसाने) प्रकल्प परिसात धुवाधार पाऊस पडत असल्यामुळे या प्रकल्पातून पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.
प्रकल्पात पाणीसाठा वाढल्याने पुणेगाव धरणात पाणी येण्यास सुरूवात झाली आहे. तसेच पुणेगाव धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पुणेगाव धरण ७५% भरले आहे. पुणेगाव धरणातून उनंदा नदीत १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याची माहिती पुणेगाव धरण शाखा अभियंता विक्रम डावरे यांनी दिली आहे. पाणी ओझरखेड धरणात येत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
सध्या, ओझरखेड धरणाचा पाणीसाठा ४४.२८ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे वणी व दिंडोरी शहरासह चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेला मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरी शेतक-यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या वाघाड धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे धरण साठ्यात कमालीची वाढ झाल्याने धरणाचा पाणीसाठा ७१ टक्क्यांवर पोहचला आहे.
सततच्या पडत असलेल्या पावसामुळे धरणसाठ्यात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे. त्याप्रमाणे दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे धरण व पालखेड धरणाला बारमाई पाणी पुरवठा करून दिंडोरी तालुक्यासह येवला, नांदगाव(मनमाड) शेतीसह पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणा-या करंजवण धरणाच्या पाणी साठ्यात समाधानकारक वाढ होत असून धरणाचा पाणीसाठा ५१% वर पोहचला असल्याने येवला, मनमाड, निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले जात आहे.
तालुक्यातील सर्वच नदी नाल्याचे पूर पाणी पालखेड धरणात जमा होत असल्यामुळे जमा होणाऱ्या पाण्याची आवक कायम जास्त असल्यामुळे जमा होणाऱ्या पाण्यावर नियत्रंण ठेवावे लागत असल्यामुळे हे जमा होणारे पाणी कधी कादवा नदीत तर कधी कालव्याद्वारे पुर्व भागातील तालुक्याच्या ताहान भागविण्यासाठी सोडून दिले जाते कारण बऱ्याच वेळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास कादवा, बोलवण, उनंदा नदीला पूर आल्यामुळे पालखेंड धरण ८० ते ९०% भरल्याचे सर्वानी पाहिले आहे त्यामुळे धरणातील पाण्याचा साठा कायम नियंत्रीत ठेवला जातो. आजही पालखेंड धरणाचा पाणीसाठा ५२.३७% इतका आहे. मागील काही दिवसापूर्वी हा पाणी साठा ८०% वर पोहचला होता. हे सर्व पाणी कादवा नदीत सोडण्यात येते आजही पालखेड धरणातून ६४६ क्युसेक्स पाणी कादवा नदीत सोडण्यात आलेले आहे.
दरम्यान, एकीकडे दिंडोरी तालुक्यातील धरणांमध्ये समाधानकारक वाढ होत असली तरी दुसरीकडे मात्र संततधार पावसामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला असून तालुक्यातील पेरणीला खोळंबा होत असल्याने बळीराजा पावसाच्या विश्रांतीची वाट बघत आहे.
दिंडोरी तालुक्यातील धरणाचा आजचा पाणीसाठा
करंजवण धरण- 51.3%
पालखेड धरण-52.37
वाघाड धरण-71%
पुणेगाव धरण-75.32
ओझरखेड धरण-44.28
तीसगाव धरण -25.25
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





