अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
दोन वर्षापासून शासनाने ठेकेदारांची देयके प्रलंबित ठेवल्याने जिल्ह्यात 620 कोटी रुपये व राज्यात 9 हजार कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहे. त्यामुळे ठेकेदारांना प्रलंबित देयके मिळण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे. शासन केलेल्या कामांचे पूर्ण बिलांची रक्कम न देता तुटपुंज देयके देत आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. वारंवार मागणी, आंदोलने करूनही ठेकेदारांचे प्रलंबित देयके शासन देत नाहीये. ठेकेदारांची बिलांची रक्कम तातडीने न मिळाल्यास कोर्टात जाऊ, असा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष दीपक दरे यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील शासकीय ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या शासकीय विकास कामांची कोट्यवधी रुपयांची देयके दोन वर्षापासून प्रलंबित आहेत. प्रत्येक वेळी केवळ 10 ते 20 टक्के निधीच शासन अदा करत आहे. याच्या निषेधार्थ बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नगर शाखेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात आजपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. असोसिएशनचे नगर शाखेचे अध्यक्ष दरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील 250 ठेकेदार या आंदोलनात तीन दिवसांत सामील होणार आहे.
यावेळी प्रलंबित देयकाच्या मागणीसाठी उपोषणकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपाध्यक्ष उदय मुंढे म्हणाले, ठेकेदारांनी केलेल्या कामांची बिले शासन पूर्णपणे न देता अर्धवट देत आहे. मंजूर कामे पूर्ण न झाल्याने अनेक विकास कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी शासनाने पुढाकार घेऊन ठेकेदारांची देयके त्वरित द्यावीत, अन्यथा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नगर शाखेच्यावतीने अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.
आंदोलनात उपाध्यक्ष संजय गुंदेचा, सह सेक्रेटरी निखिल जगताप, खजिनदार ईश्वर बोरा, माजी अध्यक्ष दिलीप जगताप, सदस्य अनिल सोनावणे, कल्याण माळवदे, मिलिंद वायकर, महेश जाजू, बाळासाहेब कचरे, अमोल कदम, रामदास कल्हापुरे, बाळासाहेब मूरदारे, अनुज सोनीमंडलेचा, राहुल शिंदे, महेश गायकवाड, दादासाहेब थोरात, कार्तिक वाबळे, प्रीतम भंडारी, रोहन मांडे, आदिनाथ घुले आदींसह ठेकेदार सहभगी झाले आहेत.