शेवगाव |वार्ताहर| Shevgav
शेतकर्यांच्या शेतातील कापूस वेचणीला आला आहे. मात्र, कापूस वेचणीसाठी मजुरांचा तुटवडा भासत असल्याने उत्पादक शेतकर्यांसमोर अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. आधीच सततच्या पावसाने कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झालेले असून आता जे काही हाती लागणार आहे, त्यासाठी शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
सध्या कापूस वेचणी सुरू असल्याने कुटुंबातील शालेय विद्यार्थी ही शेतात कापूस वेचणीसाठी पालकांना मदत करत असल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे. कापूस वेचणीचा काळ लक्षात घेता आसपासच्या गावातूनही वाहने पाठवून कापूस वेचणीसाठी मजूर बोलावले जात आहेत. मजुरीचे दर देखील सध्या प्रती किलो दहा-बारा रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. सध्या कापसाला प्रति क्विंटलला साडेसात हजारांच्या आसपास भाव आहे.
शहरी भागातील शेतकरी कुटुंबही कापूस वेचणीसाठी गावाकडे आला आहे. यंदाच्या हंगामात महागाची खते व बियाणे विकत घेऊन शेतकर्यांनी शेतात कपाशीची लागवड केली. शेवगाव तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक चाळीस हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. गेल्या काही दिवसांत झालेला सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा शेतकर्यांना लागली आहे. अती पावसामुळे कपाशीच्या पिकाची पातेगळ झाली आहे. आता शेतात ठिकठिकाणी कापूस वेचणीला आला असताना मजूर मिळत नसल्याने त्यातून मार्ग काढताना शेतकरी वैतागले आहेत.