दिल्ली । Delhi
भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. शुक्रवारी (६ जून) देशभरात ५,००० हून अधिक सक्रिय रुग्णांची नोंद झाली असून, एकूण सक्रिय रुग्णसंख्या ५,३६४ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ४९८ नवीन रुग्ण आढळले असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी सतर्कता बाळगली असून, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, केरळ हे कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. गेल्या २४ तासांत केरळमध्ये १९२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ गुजरातमध्ये १०७, पश्चिम बंगालमध्ये ५८ आणि दिल्लीत ३० नवीन रुग्ण आढळले आहेत. केरळमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्थानिक प्रशासनाने कडक उपाययोजना लागू करण्यास सुरुवात केली आहे.
राजधानी दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शुक्रवारी ३० नवीन रुग्ण आढळल्यानंतर दिल्लीतील सक्रिय रुग्णांची संख्या ५९२ वर पोहोचली आहे. यंदा १ जानेवारीपासून दिल्लीत कोरोनामुळे सात मृत्यूंची नोंद झाली आहे. सुदैवाने, गुरुवारनंतर एकाही नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही. तरीही, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्र सरकारने दिल्लीसह सर्व राज्यांना वैद्यकीय सुविधा तपासण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ११४ नवीन रुग्ण आढळले असून, यंदा जानेवारीपासून एकूण रुग्णसंख्या १,२७६ झाली आहे. याशिवाय, एका ४७ वर्षीय महिलेसह आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, राज्यातील मृतांचा आकडा १८ वर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने नागरिकांना मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.