Friday, September 20, 2024
Homeक्राईमपैशांच्या देवाण-घेवाणीतून लोणी येथील एकाची हत्या

पैशांच्या देवाण-घेवाणीतून लोणी येथील एकाची हत्या

कोल्हार येथील तिघांना अटक || मध्यप्रदेश पोलिसांकडून 24 तासांत तपास

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

- Advertisement -

लोणी येथील उमेश नागरे याची हत्या त्याच्या तीन साथीदारांनी पैशाच्या देवाणघेवाणीतून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मध्यप्रदेश पोलिसांनी 24 तासांच्या आत घटनेचा तपास करून या तीन आरोपींना अटक केली. अटक केलेले तिन्ही आरोपी कोल्हार येथील रहिवासी असून ते मयत उमेश नागरेचे जोडीदार होते. उमेशच्या त्रासाला कंटाळून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. अकिल नबाब शेख, अन्सार अल्लाउद्दीन पिंजारी व अमजद रशीद (तिघेही रा. कोल्हार, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर) अशी मध्यप्रदेश मधील खरगोन जिल्हा पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अजमेर येथून दर्शन करून पुन्हा महाराष्ट्राकडे येत असताना खरगोन व बडवांनी जिल्ह्याच्या सीमेवर मयत उमेश नागरे याची शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चार लोकांनी हत्या केल्याची माहिती मयत उमेश नागरे यांचा वाहनचालक अकिल याने पोलिसांना देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी या तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले परंतु या तिघांकडूनही चौकशीत पोलिसांना वेगवेगळी उत्तरे मिळाल्याने पोलिसांची संशयाची सुई त्यांच्यावर बळावली.

पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी केली असता उमेश नागरे याची हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. या घटनेतील फिर्यादी अकिल हा या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार निघाला आहे. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार अकिल हा तीन महिन्यांपासून उमेश याच्या गाडीवर चालक म्हणून कामास होता. अकिल याने उमेशकडून आठ ते नऊ महिन्यांपूर्वी काही पैसे व्याजाने घेतले होते व ते पैसे व्याजासह उमेशला परत केले होते. उमेश हा सराईत गुन्हेगार असल्याने तो अकिल याला वेळोवेळी औरंगाबाद, पुणे, नाशिक व लोणी येथे बोलावून घेत होता. त्यामुळे अकिल हा वैतागून गेला होता. अकिल हा उमेशकडे न गेल्यास तो त्याला धमकी देत होता की, तुझी बायको व मुलीला पळून घेऊन जाईल. त्यानंतर एक महिन्यापूर्वी उमेशने अकिल याच्या घरावर काही लोक धमकी देण्यासाठी पाठवले त्यामुळे अकिल उमेशच्या त्रासाला कंटाळून गेला होता.

त्यामुळे उमेश नागरे याची हत्या करण्याचा कट आठ महिन्यांपूर्वीच अकिल याने आखला होता. तीन ते चार वेळेस हा कट फसला होता. अजमेर येथून घरी येत असताना खरगोन व बडवाणी जिल्ह्याच्या सीमेवर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मयत उमेश हा वाहनात पुढील सीटवर झोपलेला असताना पाठीमागील सीटवर बसलेला अन्सार याने उमेशचे दोन हात धरले व अमजद याने उमेशचे हात गाडीतील सील बेल्टने बांधून ठेवत अमजद यानेच धारदार चाकूने उमेशच्या गळ्यावर व छातीवर सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली व मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. मात्र नंतर उमेश याची हत्या त्यांनीच केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. खरगोन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धर्मराज मीना व ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोहर सिंग बारिया, उपविभागीय अधिकारी अनुभाग मंडलेश्वर, मनोहर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली बलकवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर ठाकूर यांच्या पथकाने हा गुन्हा 24 तासांच्या आत उघडकीस आणला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या